Friday, December 12, 2025

लेह-लडाख-कारगिल....थरारक अनुभव..!

वयाच्या साठ वर्षापर्यंत मी ज्या गोष्टींची निर्मिती केली तिची खरंतर गणना करणं योग्य नाही. वयाचा साठाव्या वर्षापासून मला प्राण्यांची, पक्ष्यांची, झाडांची, पानाफुलांची आणि किटकांची रचना समजायला लागली. वयाच्या सत्तराव्या वर्षी मी थोडीफार प्रगती केली असेल. मला आशा आहे की ऐंशीव्या वर्षी मला कामाचं रहस्य उलघडेल. नव्वदी पार करताना मी नक्कीच महान कार्य करू शकेन तेव्हा माझ्या जीवनाचा खरा अर्थ मी माझ्या कामामधून व्यक्त करीन.' जीवनाविषयी चिंतन करणाऱ्या one hundred views of Mount Fuji या पुस्तकातील Hokusai या लेखकाचे हे उद्गार आहेत. तो ८८ वर्षे जगला. जपानी लोक कष्टाळू व दीर्घायुषी असतात. जीवनाकडे ते खूप सकारात्मक दृष्टीने पाहतात. विश्व अनंत आहे, जग अफाट आहे. आपण जितके पाहू-अनुभवु तितके कमीच आहे. रोज नवीन दर्शन घडते. नवे आणि मन मोहविणारे साक्षात्कार घडतात. जीवनाची सकारात्मक अनुभूती येते.

असंच काहीसं झालं ते काही वर्षापूर्वी लेह-लडाख-कारगिल येथे गेल्यावर ! पुण्याहून रात्री दहाची फ्लाईट रात्री पावणे बारा वाजता दिल्ली येथे पोचली, तेथून पहाटे पाचची फ्लाईट लेहला सकाळी साडेसहाला उतरली. हिमाचल प्रदेशाच्या पुढे बर्फाच्छादित पर्वतांच्या रांगा, ढगांचे भलेमोठे पुंजके दिसू लागले. पहाटे पाचवीसलाच सूर्योदय आणि कडक ऊन होते. जुलैचा शेवटचा आठवडा होता. लेहचे विमानतळ लष्करी असून छोटे आहे. नवीन विमानतळाचे बांधकाम चालू आहे. तेथे आणखी एक इमर्जन्सी मिलिटरी एअरपोर्ट आहे. लडाख-लेह-कारगिल अशी हिमालयाची पूर्वपश्चिम पर्वतरांग पसरली आहे. लडाख हा भारतातील सर्वात उंच भाग आहे. लेह गाव अकरा हजार फूट उंचीवर आहे. तो जिल्हा असून या शहराची लोकसंख्या दीड लाख आहे. तेथे बौद्धधर्मिय बहुसंख्य आहेत. कारगिलमध्ये पाकिस्तानची सीमा लागते. एप्रिल ते सप्टेंबर पर्यटन चालते. बाकी बर्फच असतो. ऑक्टोबरच्या काळात बर्फ असतानादेखील बरेच परदेशी पर्यटक येतात. पहिला दिवस विमान प्रवासाचा हँगओव्हर मुळे झोपण्यातच गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही नुब्रा व्हॅलीकडे गेलो. जाताना खारदुंगला पास लागतो. पास म्हणजे एक घाट चढून परत उतरताना मध्यावर लागणारी उंच जागा होय. हा पास १७९८२ फूट उंचीवर लेह मध्ये आहे. तेथे सियाचीन बेस कॅम्प असून त्यास गेट वे ऑफ सियाचीन असे म्हटले जाते. उंचीवर अर्थातच एसीसारखी थंड हवा असते. पावसाचे शिंतोडेही उडाले. Karakoram पर्वताची रांग आणि सभोवतालचे बर्फ सारे दृश्य पाहण्यासारखे होते. प्रचंड डोंगरदऱ्या बाकी काही नाही. एक अद्भुत अनुभव ! संध्याकाळपर्यंत नुब्रा व्हॅली काही संपता संपेना. त्या व्हॅलीतच लांबपर्यंत वस्ती होती. ५०-६० किलोमीटर पसरलेली. पूर्ण प्रवास १२५ किलोमीटरचा होता. तिबेटियन शब्द डुमराचे नुब्रा झाले आहे. हा जणू त्रिभुज प्रदेश आहे. डुमरा म्हणजे फुलांची दरी. रात्री Hunder village मध्ये वस्ती केली. दुसऱ्या दिवशी आम्ही भारत-पाकिस्तान सीमेवर गेलो. Turtuk, Tayshi व नंतर Thang हे गाव शेवटी लागते. तेथून सीमेवरील काटेरी कुंपण दिसते. पाकिस्तानातील गाव व झेंडा दिसतो. हा सारा रस्ता Shyok या खळाळत्या नदीच्या काठाने जातो. हा सारा परिसर लेह जिल्ह्यातील नुब्रा तालुक्यात येतो. १९७१ च्या युद्धानंतर या Indo-pak बॉर्डरवरील चार गावे भारतात आली. त्या प्रदेशास Gilgit Baltistan असेही म्हणतात. पुढे अफगाणिस्तान व चीन यांच्या सीमा लागतात. Turtuk, Thang गावात बाल्टी वंशाची कुटुंबे राहतात. इसवी सन २०११ मध्ये तेथे फक्त १६ कुटुंबे होती.


तिसऱ्या दिवशी Pangong Lake पाहण्यासाठी चाललो. जाताना Sakti village लागले. अगोदर वारीला पास लागतो. हा १७४२७ फूट उंच आहे. पूर्व लडाख व पश्चिम तिबेटमध्ये पसरलेला खाऱ्या पाण्याचा हा तलाव ! १३४ किलोमीटर लांब आहे. तो १३८६८ फूट उंचीवर आहे. ५०% चीनमध्ये ४०% तिबेटमध्ये व दहा टक्के भारतात असा हा तलाव, खूपच सौंदर्यपूर्ण..! आजूबाजूला फक्त डोंगर रांगा व आकाशाची पोकळी...! रंग बदलणारे पाणी...! हिवाळ्यात हे सरोवर पूर्णपणे गोठते. या सरोवराच्या काठी राहण्यासाठी असलेले कॉटेज अतिशय सुंदर आहेत. परत येताना आम्ही Changala Pass (Top) येथे थांबलो. तो १७६८८ फूट उंच आहे. हवेहवेसे थंडगार वारे, शुद्ध स्वच्छ हवा...! पाय हलत नाही...! तिथून परत येताना खूर (khur) या गावात दुपारचे जेवण केले. तेथेच मी दोन सुंदर रोपटी घेतली, आता ती कोल्हापुरात आहेत. येथे NH 3 चा रस्ता लागतो. 

पुढच्या दिवशी NH 1 या रस्त्याने आम्ही कारगिल येथे चाललो. हा रस्ता पुढे श्रीनगरकडे जातो. हा जिल्हा असून लोकसंख्या दीड लाख आहे. अर्थातच वाटेत Namikala pass १२१९८ फूट आणि Fotula pass १३४७९ फूट उंचीवर लागतात. सिंधू नदीवरील घाट (Indus river ही नदी तिबेटमध्ये उगम पावलेली आहे.), Thiksey Monastry (दोन्ही लेहपासून २२ किलोमीटर अंतरावर आहेत.) आणि Maitreya Statue पाहिला. Rancho School जेथे आमीर खानच्या थ्री इडियटचे शूटींग झाले होते, ते पाहण्यासारखे आहे. World's Hights Rafting Point हा Indus आणि Zanskar या नद्यांच्या संगमावर आहे. हा नद्यांचा संगम Nemo या गावात आहे. येथे तीन टप्प्यात राफ्टींग करता येते. संथ, गतिमान आणि खूपच खळाळत्या पाण्यावर...! लेहपासून कारगिल २०८ किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत काही Stupa तसेच दगडात कोरलेली क्राफ्टिंग बुद्धाची मूर्ती पाहिली. Indus नदीच्या कडेनेच कारगिलकडे रस्ता जातो. वाटेत Lamayuru gonpa moon land लागते. जणू चंद्रावरील भूमीसारखा हा प्रदेश दिसतो. कारगिलमधील Suru नदी काठावरील TFC ची गार्डन खूप छान आहे. कारगिलच्या अलीकडे ५५ किलोमीटरवर Dras येथे कारगिल वॉर मेमोरियल आहे. छत्रपती संभाजीनगरचे फौजी गणेश भुतेकर यांनी आम्हाला या युद्धाबद्दलची माहिती दिली. या स्मारकात आपली व शत्रूची शस्त्रे, फोटो, बातम्या माहितीसह लावलेले आहेत. हॉलमध्ये ७०-८० पर्यटक होते. तेथेच मला कॅप्टन विजयवंत थापर यांचे आई-वडिलांना पाठवलेले शेवटचे पत्र मोठ्या आवाजात वाचण्याची संधी मिळाली. खरं तर कंठ दाटून आला होता. २८ जून १९९९ रोजी विजयवंत शहीद झाले. त्यावेळी ते केवळ २२ वर्षांचे होते. त्यांचे घरगुती नाव रॉबिन होते. ते पत्र....

प्रिय पापा, मामा, बर्डी और ग्रेनी,
1. जिस समय आपको यह पत्र मिलेगा, उस समय तक मैं स्वर्ग में अप्सराओं के बीच से आप सब को देख रहा होऊंगा.
2. मुझे ज़िंदगी में कोई खेद नहीं है, अगर फिर से इनसान के रूप में मेरा जन्म हुआ, तो मैं फौज में भर्ती होकर अपने देश की सेवा करूंगा.
3. अगर आप लोग आ सकते हैं, तो कृपया आकर उस जगह को ज़रूर देखिए, जहां भारतीय सेना ने आपके आने वाले कल के लिए लड़ाई लड़ी थी.
4. जहां तक हमारी यूनिट का सवाल है, तो नए जवानों को इस बलिदान के बारे में ज़रूर बताया जाना चाहिए. मुझे आशा है कि मेरी तस्वीर ‘ए’ कॉय मंदिर में करणी माता के साथ रखी जाएगी.
5. हमारे शरीर से अंगदान के तौर पर जो भी अंग लिया जा सकता है, उसे ज़रूर लिया जाए.
6. कृपया कुछ पैसे अनाथ आश्रम को दे देजिएगा और हर महीना पचास रुपया रुखसाना को देते रहिएगा और योगी बाबा से भी ज़रूर मिलिएगा
7. बर्डी को मेरी शुभकामनाएं, कृपया इन लोगों के बलिदान को कभी मत भूलिएगा. पापा, आपको गर्व होना चाहिए और मम्मा आपको भी. कृपया…से (निजता की वजह से नाम हटा दिया गया है) मिलते रहिएगा (मैं उससे प्यार करता हूं). मामाजी मेरी भूल-चूक को माफ कर देना.
ठीक है फिर, अब मेरा डर्टी डजन की टुकड़ी के साथ जाने का वक्त हो गया है. मेरे हमलावर दस्ते में बारह जवान हैं. आप सभी को मेरी शुभकामनाएं.
लिव लाइफ, किंग साइज़
आपका
रॉबिन

(हे करणी माता मंदिर राजस्थानमध्ये आहे तेथे असंख्य उंदीर सर्वत्र फिरत असतात. रुकसाना छह साल की बच्ची थी और जम्मू-कश्मीर के कुपवाड़ा में रहती थी. रुकसाना के पिता की आतंकवादियों ने उसी के सामने हत्या कर दी थी. इस हादसे से रुकसाना की बोलने की क्षमता चली गई थी. जिस समय रुकसाना के पिता की हत्या हुई थी कैप्टन विजयंत थापर उसी जिले में तैनात थे. जब उन्होंने रुकसाना के साथ हुए हादसे के बारे में सुना तो वे उससे मिलने उसके स्कूल जाने लगे.) परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बात्राची गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे. त्याचे 'दिल माँगे मोअर' हे उद्गार आणि त्याच्यावरील 'शेरशाह' हा चित्रपट..! येताना लेहमधील 'हॉल ऑफ फेम' हा कारगिलवरील लेसर शो पाहिला. 

शेवटी लेहमधील शांतिस्तूप पाहून परतलो. येथील शांतिस्तूप ११८४१ फूट उंचीवर आहे. तो २५ ऑगस्ट, १९८५ ला बांधलेला आहे. विविध आकारातील हे स्तूप बुद्धांच्या संदेशाचे व मनाचे प्रतीक आहेत. कारगिल मार्गावरच गुरुद्वारा श्री पत्थर साहिब आहेत. गुरुनानक देव यांनी आपल्या यात्रेदरम्यान सन १५१७ मध्ये तेथे मुक्काम केला होता. त्याची एक मोठीच कहाणी आहे. त्याच्याच पुढे Magical Magnetic Hill लागते. तेथे गुरुत्वाकर्षणामुळे रस्त्यावर गाडी लावल्यास परत मागे फिरते. १९९९ मध्ये पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर कारगिल येथे आपले जवान आता हिवाळ्यात सुद्धा उणे ४०°c अशा थंड हवेतही पहारा देत असतात. Vijayak Project आणि BRO या पर्वतरांगातून रस्ते बनवत आहे पण हिमालय पर्वत ठिसूळ असल्याने जागोजागी land sliding होते; तर कधी कधी ढगफुटीमुळे रस्ताच वाहून जातो. आमची गाडी अशाच एका रस्त्यावर अडकली. आम्ही सगळे खाली उतरलो तर बर्फाहून थंड पाण्याने पायातले बळच गेले. हा अतिशय थरारक अनुभव होता. जुलैमध्ये लेहला १२, नुब्राला ७, पेनगॉगला ७ तर कारगिल येथे ११ असे तापमान असते. हिमालयाच्या पर्वतरांगामुळे खरे तर पावसाळी ढगांना अटकाव होऊन ढगांची फक्त सावलीत पडत राहते, पाऊस जवळजवळ नसतोच, त्यामुळे पुढे होणाऱ्या हिमवर्षावातूनच पाणी मिळते. झाडे, घनदाट जंगल असे काहीच नाही. केवळ उघडे-बोडके डोंगर दिसतात. मात्र काही ठिकाणी उंच poplar, willo ही झाडे दिसतात. willo या झाडापासून बॅट बनवली जाते. Himalayan Mormat (खार), Dong Yak, अस्वले, काळवीट, Ibex ही काळवीटासारखी दिसणारी दणकट मेेंढी, सुुवर्ण गरुड असे पक्षी-प्राणी तेथे आहेत. तेथील apricot (जर्दाळू) प्रसिद्ध आहे. लडाखी भाषेत Julley म्हणजे वेलकम, थँक्यू, नमस्ते हा अर्थ आहे. 

सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निमित्ताने समाजमाध्यमांवर त्यांची बाजू मांडणारा व त्यांना बदनाम करणारे असे दोन गट तयार झालेले दिसतात. गमतीचा भाग म्हणजे यातील बहुतेकांना सोनम वांगचुक किंवा लदाख याबद्दल सगळी ऐकीवच माहिती आहे, स्वानुभव काहीच नाही.

सोनम वांगचुक हा तिथला खराखुरा पर्यावरणवादी, उत्कृष्ट संशोधक व महात्मा गांधींच्या खरी तालीम या तत्त्वावर शैक्षणिक प्रयोग करणारा एक अवलिया. बोले तैसा चाले याचं परिपूर्ण उदाहरण. याचे पर्यावरण आणि जागृतीविषयक व शैक्षणिक म्हणता येतील असे व स्वतःचे अनुभव शेअर करणारा, तेव्हा सोलर वॉटर हीटरवर बरीच चर्चा सुरू होती त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची इतर भागातली गणितं इथे लावू नका. लदाखमधली माणसं दहा-दहा दिवस आंघोळी करत नाहीत, गरजच पडत नाही त्यांना. पाण्याची प्रचंड कमतरता आहे आणि बरेच लदाखी दिवसाला पाच लिटर इतक्या कमी पाण्यात राहू शकतात. सोनम वांगचुक हा अतिशय सजग आहे. कमीत कमी ऊर्जा वापर कमीत कमी रिसोर्सेस वापरणे हे तो स्वतः पाहतो, वागतो.‌ कैराट या कारगिल भागातील एका गावाजवळ त्यांनी निवडलेल्या जमिनीवर आतापर्यंत चारहजार झाडं त्यांनी लावली आहेत, युवा कैराट नावाचा एक ग्रुप या झाडांची काळजी घेतो. लल्लनटॉप च्या एका मुलाखतीत त्यांनी थ्री इडियट मधील फुंनसुक वांगडू ही भूमिका त्याच्यावरील आहे, हे सांगितले. सोनम भाषाप्रेमी आहे आणि जवळजवळ आठनऊ भाषांवर त्याचं प्रभुत्व आहे.‌ गाणीही छान गातो.‌त्याचं वागणं बोलणं बहुतेक सगळं ग्रासरूट इनोवेशन्स, पर्यावरण व शैक्षणिक सुधारणा याच्याशी निगडित असतं.

अर्थात जे लिहिले ते खूपच रुक्ष आहे. लेह-लडाख-कारगिल प्रत्यक्ष पाहणे हा अनुभवच खूप थरारक असेल. माझ्यासोबत कराडचे (जि. सातारा) राजेंद्र थोरात आणि त्यांची पत्नी ज्योत्स्ना थोरात हे दोघे होते. त्याचबरोबर रिद्धेश होता. मानस ऊर्फ मन्या सुर्वे आणि मल्हार ऊर्फ चुलबुल पांडे  पुण्याची ही दोन मुलेही सोबत होती. परत येताना दुपारी एक वाजता लेह ते दिल्ली विमानातून बर्फ पांघरलेल्या या पर्वतरांगा वरुन ढगांतून बघताना अतिशय रम्य वाटते. लेह ते दिल्ली व दिल्ली ते पुणे या विमान प्रवासात खिडकीजवळ (window seat असे इंग्रजीत म्हणतात. 😂) बसलो होतो, त्यामुळे आकाशातून जमिनीवरील दिसणारे दृश्य अतिशय मनमोहक होते.
                                                            🌿🌿🌿 

विमानप्रवास...!

लहानपणी एखाद्या विमानाचा अथवा हेलिकॉप्टरचा आवाज आला की आम्ही घरातून पळत जाऊन आकाशात बघत असू. गल्लीत एखादी कार आली की तिच्यामागे धावत जात. त्यावेळी सगळी मुले घरात किंवा गल्लीत असत. विमानात बसू, कार चालवू असे स्वप्नही पडले नव्हते, पण दिवस काही घर बांधून राहत नाहीत. नोकरी लागूनही सुरुवातीची किमान पंधरा वर्षे पगार अत्यंत कमी असल्याने ही स्वप्ने पंधरा-वीस वर्षानंतरच पूर्ण झाली. लग्न, घर, गाडी, विमानप्रवास, परदेशवारी अशी जुन्या माणसांची मोजकी स्वप्नं असत. आता स्वप्ने वाढलेली आहेत.

भारतातील सर्व प्राध्यापकांनी बेमुदत संप केला ते वर्ष होतं २०१३. त्याच वर्षी दिल्ली येथे प्राध्यापकांचा मोर्चा होता. अचानक मी जायचे ठरल्याने जाताना रेल्वे व येताना विमान असा प्रवास ठरला. गोवा ते दिल्ली या निजामुद्दीन एक्सप्रेसने बेळगावहून ३६ तास प्रवास करून पहाटे सहाला दिल्ली येथे पोहोचलो. मोर्चा होता अकरा वाजता. तोपर्यंत दिल्लीतील काही ठिकाणे पाहिली. मोर्चा केला. पहाडगंज या भागातील एका रेस्टॉरंटमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी मेट्रोने प्रवास करून लोटस टेम्पल पाहिले. राजीव गांधी चौकातील कबुतरांचे थवे आकर्षक होते. नंतर भारतातील सर्वात मोठ्या दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. विमानतळ असा असतो, इतका भव्य दिव्य ? चित्रपटातही त्याचे दर्शन व्यवस्थित घडत नाही. मुळात दिल्ली, विजापूर ही मुगल-आदिलशाही शहरे सपाट प्रदेशावर वसलेली आहेत. तेथे टेकड्याही अगदीच तुरळक आहेत. विमानतळ पाच हजार एकरावर पसरलेला आहे. या विमानतळावर तीन terminal आहेत. शंभरच्या आसपास gate (प्लॅटफॉर्म) आहेत. टर्मिनल तीनवर domistic gate 78 व international gate 26 आहेत. वर जाणारे व सरळ रेषेत रस्त्यासारखे जाणारे सरकते जिने (elevators), चकचकीत ब्रॅण्डेड कंपन्यांची दुकाने, विविध शिल्पे सारे काही वेगळेच विश्व होते. दिल्लीहून विमान निघाले. टेकऑफ घेताना थोडी धडधड वाढली. पहिलाच विमान प्रवास होता. पुन्हा ते गुजरात येथे अहमदाबादला सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लँडिंग झाले. फिर दिल की धडकन बढ गयी. पुढे ते पुन्हा टेकऑफ घेऊन गोव्याला लँड झाले, म्हणजेच ती दिल्ली-गोवा व्हाया अहमदाबाद अशी फ्लाईट होती. एकाच प्रवासात दोनदा लँडिंग व टेकऑफ झाले. अर्थात दाबोलिम गोवा विमानतळ पाहिला पण तो तसा छोटा आहे. आपणासारख्या सामान्य माणसांच्या दृष्टीतून दिल्ली, मुंबई सारख्या विमानतळांची वर्णने करण्यास कित्येक पाने खर्च करावी लागतील. असो. 


मग भूतानला गेलो. भूतान छोटा, गरीब पण समाधानी देश आहे. हिमालयाच्या कुशीतील हा रम्य देश. बटाटा ही या देशाची मुख्य शेती तर हायड्रोपाॅवर आणि पर्यटन हे या देशाचे उत्पादन आहे. जगातील दहापैकी एक धोकादायक विमानतळ म्हणजे पारो. जाताना फ्लाईट नव्हती. आम्हाला duronto express या रेल्वेचे तिकीट हवे होते. ती एक शाही रेल्वेसेवा आहे. पण ती मिळाली नाही, मग पुण्याहून आझाद हिंद एक्सप्रेस मिळाली. ती ३६ तासांनी हावडा कलकत्ता येथे पोहोचली. हावडा हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे. ३६ फूट उंचीचे सर्वात उंच छत आहे. तर एकूण २६ प्लॅटफॉर्म आहेत. आमच्याकडे एक दिवस असल्याने कलकत्ता पाहिले. हावडा ब्रिज व अथांग हुगळी नदी, रेल्वे म्युझियम, कालीमाता मंदिर, मार्बलचा भव्य व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल इत्यादी पाहिले. ६४ एकरातील हा हॉल लॉर्ड कर्झनने १९०६ ते १९२१ या काळात बांधला. बंगाली रसगुल्ला, मालपुवा यांची लज्जत न्यारीच..! एक दिवस तेथे थांबून मग लाटागुडी, सिलिगुडी पाहिली. जेथे हत्ती मोर आहेत असे जंगलातील शहर म्हणजे सिलिगुडी. हिमालयातून उगम पावणाऱ्या निळ्या-खळाळत्या पाण्याच्या तिस्ता नदीच्या काठाने भारतातल्या सीमेवरील जलपाईगुडी या शहरातून भूतानमध्ये प्रवेश केला. भूतान, दार्जिलिग, सिक्कीम व गंगटोक करून परत पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावरून सरळ पुणे विमानतळावर पोहोचलो. पुणे विमानतळ आंतरराष्ट्रीय असले तरी छोटे आहे. बागडोगरा हे देशांतर्गत विमान सेवा देणारे छोटे विमानतळ आहे. प्रवेशद्वारातील शिवाजी महाराजांचा ब्राझचा पुतळा तसेच पंढरीच्या वारीचे चित्र आणि मलखांबांची शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात. पुणे विमानतळाला आता संत तुकाराम विमानतळ असे नाव देण्याचे प्रस्तावित आहे. कारण हा विमानतळ लोहगाव येथे आहे. लोहगाव हे ठिकाण संत तुकारामांचे आजोळ असून तेथे अनेकदा संत तुकाराम कीर्तन करण्यास येत असत.

पुन्हा एकदा दिल्ली पाहण्यास पुण्याहून गेलो. दिल्ली-पुणे केवळ दोन तासाचे अंतर. दोन दिवस दिल्ली, आग्रा ही प्रसिद्ध ठिकाणे पाहिली. कुतुबमिनार, जामा मशिद, लाल किल्ला, इंडिया गेट, ताजमहल...! मग पुणे एअरपोर्ट परिचयाचेच होऊन गेले. 

पुढे केरळला जाताना अडचण आली. मुंबई-कोचीन या रत्नागिरीहून जाणाऱ्या रेल्वेचे बुकिंग दोन महिने अगोदर सुद्धा मिळाले नाही. मग द्राविडी प्राणायाम करावा लागला. लक्झरीने कोल्हापूर-बेंगलोर केले. बेंगलोरच्या कैम्पेगौडा विमानतळाहून कोची(न) गाठले. बेंगलोर विमानतळाचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. बेंगलोर, दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास शहरे मोठी व विमानतळही मोठे आहेत. २००१ मध्येच बेंगलोर शहर दोन दिवस फिरून पाहिले होते. कोचीन हे प्रथमतः पोर्तुगीज व डच यांनी हस्तगत केले. याच कोचीन एअरपोर्टवर २०१५ मध्ये blind landing घडले होते. त्यावर आधारित Runway 34 हा अजय देवगण अभिनित चित्रपटही आहे.

केरळहून परत येताना तिरुअनंतपूरम विमानतळावरून हैदराबाद येथील राजीव गांधी विमानतळावर आलो. हैदराबाद एअरपोर्ट खूप छान आहे. तेथून connected flight ने पुणे गाठले. या कनेक्टेड फ्लाईटचे कधीकधी घोटाळे होतात. एकदा मी व माझा छोटा मुलगा काश्मीरला चाललो होतो. मुंबई-दिल्ली-श्रीनगर व परत श्रीनगर-दिल्ली-मुंबई अशी कनेक्टेड फ्लाईट होती. मुंबईला दोन दिवस अगोदर गेलो. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, मंत्रालय, कसाब आला ते ठिकाण पाहिले. वरळी सी फेस टॅक्सीतून पार केला. मुंबई एअरपोर्ट पाहण्याची उत्कंठा होतीच. तीन तास अगोदर जावे लागायचे. हा अतिभव्य विमानतळ आहे. तेथे प्रवेश करतानाच त्याच्याभोवती आपली कार फिरून जाताना त्याची भव्यता लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हा विमानतळ आहे. प्रवेशद्वारातच महाराजांचा पुतळा आहे. भारतातील सर्वात व्यस्त असणाऱ्या या विमानतळावरून दररोज सरासरी एक हजार उड्डाणे होतात. तेथे अकराची फ्लाईट एक वाजता निघाली. एसटीप्रमाणे विमानही उशिरा निघाले. पुढे दिल्लीची कनेक्टेड फ्लाईट अर्थातच चुकली. श्रीनगरला जाणारे चाळीस प्रवासी दिल्लीत विमानतळावरच अडकले. मग विमान कंपनीच्या काऊंटरवर हुज्जत घालून, टूर कंपनीला फोन करून दोन गटात पुढच्या दोन फ्लाईटने प्रवासी उशीरा श्रीनगरला पोहोचले. झेलम नदीच्या काठी काश्मीरचे खोरे वसलेले आहे. बारामुल्ला, कुपवाडा, श्रीनगर असे तीन जिल्हे येथे महत्त्वाचे आहेत. मोगल बादशहांनी बांधलेल्या शालिमार आणि निशांत गार्डन अतिशय रम्य आणि विस्तीर्ण आहेत. दाल लेकमधील शिकारा आणि चार चिनार गार्डन जिथे अनेक चित्रपटांचे चित्रिकरण झालेले आहे, ते पाहण्यासारखेच आहे. सफरचंदाच्या बागा आणि केशरची शेती तसेच चिनार, पाइन, देवदार, चेरी, विलो असे वृक्ष सर्वत्र दिसतात. विलोच्या झाडापासून क्रिकेटची बॅट तयार करतात. श्रीनगर छोटे विमानतळ आहे. परत येताना कनेक्टेड फ्लाईट वेळेवर मिळाल्या. श्रीनगर ते कन्याकुमारी असा भारताच्या नकाशावर सरळ उभ्या रेषेत हायवे आहे. याच हायवेवरती केव्हाही विमान लँड करता यावे इतके एका ठिकाणी रुंदीकरण केलेले आहे.

पुणे-दुबई हे अंतर तीन तासाचे. दुबई एअरपोर्ट ऐसपैस पसरलेला व श्रीमंत आहे. अबुधाबी, दुबई, शारजाह अशी सात संयुक्त अरब अमिरात राष्ट्रे (UAE) एकत्र आली आहेत. ही छोटी छोटी शहरेच आहेत. त्यामुळे शेजारचे अबुधाबीही पाहिले. पाकिस्तानी लोकांना मुंबईचे आकर्षण आहे तर मुंबईच्या लोकांना (भारतीयांना) दुबईचे...! वर्णन करण्यापेक्षा दुबई प्रत्यक्ष पहावीच. आठ-आठ असे सोळा पदरी रस्ते, रस्त्यावर सर्वत्र कार दिसतात. मालवाहतुकीची वाहने खूप कमी, टू व्हीलर नाहीत. कुठेही हॉर्न ऐकू येणार नाही. ट्रॅफिक पोलीस दिसणार नाही. अपघात नाहीत. सोन्याची चप्पल, पर्स, गाऊन इतकेच काय सोन्याची नाणीही. जगातील सर्व दुबईत आणण्याचा अट्टाहास येथील राजेशाहीचा आहे. पहिला आयफोन दुबईत येतो मग इतरत्र..! टेस्ला कार दुबईत आहे. दुबईवर स्वतंत्र असं लिहावे लागेल.

राजस्थानचे जयपूर विमानतळ राजेशाही थाटाचे आहे. मारवाड व मेवाड अशा दोन भागात राजस्थान पहावा लागतो. अर्थात दोनदा. बिकानेरची गजक मिठाई छान आहे. पण तेथेच सतीची मंदिरे आहेत. प्रचंड संख्येने एकत्रित अनेक स्त्रिया सती गेल्याच्या खुणा (त्यांच्या हातांची शिल्पाकृती छाप) जागोजागी दिसतात. राजस्थानचा खेजडी वृक्ष प्रसिद्ध आहे, त्याच्या सांगरी या फळांची भाजी करतात. याच वृक्षाला आपल्याकडे शमीचे झाड म्हणतात, ज्यावर पांडवांनी आपली शस्त्रे वर्षभर लपवली होती. जोधपूरला काळविटांचे अभयारण्य आहे. श्रीलंकेत ज्याप्रमाणे हत्तींचे अभयारण्य आहे तसेच बिकानेरमध्ये उंटांसाठी नॅशनल रिसर्च सेंटर (ICAR) आहे. राजस्थान व लडाखमधील उंट आहेेेत. भारतात किमान चार Elephant Sanctuaries आहेत, पैकी जयपुर मधील एलिफंटास्टिक (Elefantastic) खूप छान आहे. पुणे ते जयपूर अथवा जोधपूर असे जाता येते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे पुणे हे जंक्शन विमानतळ आहे. 

मुंबईहून मॉरिशसला जावयास सहा तास लागतात. अर्थात दोन तासापेक्षा जास्त प्रवासात जेवणाच्या वेळी जेवण असतेच पण जेवणापूर्वी व नंतर सर्व प्रकारची पेयेसुद्धा असतात. प्रत्येक प्रवाशांच्यासमोर स्क्रीन असते. गाणी, चित्रपट पाहता येतात. Tata Vistaraचे विमान होते. रतन टाटाच्या मृत्यूपूर्वी २०२४ मध्ये ही कंपनी बंद झाली. ती एअर इंडियात विलीन झाली. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे सर शिवसागर रामगुलाम एअरपोर्ट आहे. हे देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव. अगदी छोटे विमानतळ, ते सुद्धा एकच. या बेटाची लोकसंख्या फक्त तेरा लाख. २०४० किलोमीटर वर्ग क्षेत्रफळ. दरडोई उत्पन्न वार्षिक बारा लाख रुपये आहे. येथे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना खूपच मानाचे स्थान आहे. अलीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला आहे. स्वच्छ सुंदर निसर्गरम्य बेट आहे. अर्थात चोहीकडे निळ्याशार नितळ पाण्याचे समुद्रकिनारे आहेत. भारतीय लोक खूप आहेत. त्यामुळे हनुमान, गणेश, काळभैरव, महादेव, कालीमाता, विठ्ठल यांची मंदिरे आहेत. ऊस हे प्रमुख उत्पादन. साखर आफ्रिकेला निर्यात होते. येथेही हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही. अपघात नाही. येथला बदकासारखा राष्ट्रीय पक्षी 'डोडो' नष्ट झाला आहे. तो फ्रेंच-पोर्तुगीज यांनी मारून खाल्ला. आता फक्त नावालाच शिल्लक आहे. 

परत मुंबई-कोलंबो विमानतळाच्या भेटी, अर्थातच श्रीलंकेमुळे झाल्या. कोलंबो साधा विमानतळ आहे. श्रीलंका गरीब पण निसर्गाने समृद्ध देश आहे. सुंदर रस्ते, खळाळत्या नद्या, घनदाट जंगल, प्रवाळाचे खडे, हत्ती यामुळे हा देश ओळखला जातो. भात, केळी, नारळ, सुपारी हेच उत्पन्न आहे. बाकी फारशी प्रगती नाही. श्रीलंकेतील Pinawala Elephant Orphanage पाहण्यासारखे आहे. श्रीलंकेची सहल अविस्मरणीयच होती. कोलंबोचा समुद्रकिनारा, सर्वत्र घनदाट जंगल, सुंदर वळणदार रस्ते, खळाळत्या स्वच्छ पाण्याच्या नद्या सारेच नयनरम्य होते. आम्ही गेलो दक्षिण श्रीलंकेत जेथे हिंदी महासागर आणि अरबी समुद्र एकत्र येतो त्या समुद्री पाण्यापर्यंत..! कोलंबो, गले, मारले, कॅंडी, नाॅवरा इलिया, डेम्बुला, बेनटोटा ही ठिकाणे आणि अनाथ हत्तींचा Pinnawala Elephant Orphanage पाहिला. Ramboda Waterfall प्रचंड होता. गोल्डन टेम्पल व १५३ बुद्ध मूर्तींची गुहा आश्चर्यचकित करते. सगळ्यात भारी Sigiriya Rock Fort.... आम्ही फक्त सहाजणच वर गेलो, रायगडसारख्या चौदाशे पायऱ्या..! चौदाव्या शतकातील एका राजाची राजधानी. मग gorge lack, turtle hatchery, अशोक वाटिका, स्पाइस गार्डन, व्हिक्टोरिया गार्डन या गोष्टी होत्याच.

आता परत पुणे-दिल्ली-लेह (कुशोक बकुला रिम्पोची एअरपोर्ट) असा प्रवास सुरू आहे. सारा प्रवास रात्रीचा...! रात्री दहा ते बारा पुणे नंतर दिल्ली विमानतळावरून Terminal 3 वरुन दिल्ली ते लेह असे हिमालयाच्या पर्वतरांगावरून उड्डाण...! सकाळी लवकर पाचवीसला उगवणारा सूर्य पूर्णपणे तळपत होता. त्याखाली आमचे विमान, त्याखाली ढगांचे पुंजकेच्या पुंजके, त्यातून हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि खोल दऱ्यातून वाहणारे खळाळते पाणी असे दृश्य विमानातून मनाला मोह घालत होते. लेह पांढऱ्या दगडमातीने आणि हिमालयातील टेकड्यांनी वेढलेले एक छोटे शहर आहे. आता अद्ययावत नवीन विमानतळ बांधकाम सुरू आहे.

ऑक्टोबरच्या शेवटी व नोव्हेंबरच्या सुरुवातीला (२०२५) अंदमानला भेट दिली. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून अंदमानच्या पोर्ट ब्लेअर राजधानीत सलग तीन सव्वातीन तास प्रवास होता. नारळीच्या फांद्या व हिरव्यागार वृक्षराजीने झाकलेले अंदमान हे बेट विमानातून खूप छान दिसते. ही छोटी छोटी पाचशे सत्तर बेटे आहेत. निळ्याशार पाण्याचे समुद्रकिनारे आणि त्या पाण्यातील विविध आकाराची कोरल, रंगीबेरंगी मासे पाहताना एका वेगळ्याच दुनियेत आपण पोहोचतो. तेथील बेटांना आता भारतीय नावे दिलेली आहेत. रॉस आयलँडचे आता नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप, हॅवलॉकचे स्वराज्यदीप तर पोर्ट ब्लेअर विमानतळाचे वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव झालेले आहे. छोटाच एअरपोर्ट आहे..! हॅवलॉकचा राधानगर हा जगातील सातपैकी सर्वात स्वच्छ निळ्याशार पाण्याचा व सुरक्षित समुद्रकिनारा आहे. सेल्युलर जेल व तेथील लाईट साऊंड शो पाहण्यासारखा आहे.

वंडूर येथील महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्कमध्ये एकूण सतरा बेटांचा समूह आहे. तेथे needle, finger, seafan, honeycomb, sun, bubble, black अशी कोरल बघायला मिळतात. Jolly boux हा आयलँड दरवर्षी १६ नोव्हेंबरपासून सहा महिने सुरू असतो व सहा महिने बंद असतो. अंदमानमध्ये क्षेत्रीय मानव विज्ञान संग्रहालय (anthropological), Naval Marine  Museum (Samudrika) ही संग्रहालये खूप छान आहेत. तेथील Chatham Government  Saw Mill प्रसिद्ध आहे. जपानी लोकांच्या ताब्यात ती होती. ब्रिटिशांनी १९४३ मध्ये तेथे बॉम्ब हल्ला केला. १९१८ मध्ये दुर्गाप्रसाद (०७/०१/१९०० ते ३०/०५/१९७३) हा वन अधिकारी सेवेत होता. त्याला १९४२ ला चाथम आरा नष्ट करण्यास ब्रिटिश सरकारने सांगितले, पण त्याने ती नष्ट केली नाही. अंदमान येथे Jarawa ang, Onge, Sentinelese, Shompens या जातीचे आदिवासी राहत होते. Sentinelese या आदिवासींच्या वीस झोपड्या अगदी एका कॉलनीप्रमाणे एकत्र जोडलेल्या असतात. दक्षिण अंदमान येथे पश्चिमेला ते राहतात. सध्या त्यांची लोकसंख्या फक्त ३९ (२०२० मध्ये) आहे. भारतात नागालँडमध्ये नागा, मेघालयमध्ये Khasi आणि आसाममध्ये Bodo तर साऊथ आफ्रिकेमध्ये Kung हे आदिवासी राहत होते.


भारतात छोटे-मोठे पाचशेच्या आसपास विमानतळ आहेत. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, अहमदाबाद, गोवा, जयपूर, पोर्ट ब्लेअर, अमृतसर हे सर्वात व्यस्त विमानतळ आहेत. विविध कंपन्यांची विमाने आहेत. आता संजय घोडावत ग्रुपची स्टार विमानसेवाही समाविष्ट झालेली आहे. दिल्ली (DEL), दुबई (DXB), मॉरिशस (MRU) अशी सांकेतिक नावे असतात. अर्थात हे सारे प्रत्यक्ष अनुभवावे असेच आहे. अजून खूप पल्ला गाठावयाचा आहे. वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थी मित्र डाॅ. संदीप भुयेकर आहे. दिल्ली विद्यापीठात डाॅ. तेजस चव्हाण आहे. त्यामुळे वाराणसी, इजिप्तचे कैरो, लंडनचे हिथ्रो तशीच थायलंड, सिंगापूर, मलेशिया येथील एअरपोर्ट पहावयाचे आहेत. शताब्दी आणि वंदे भारत या एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करायचा आहे. अरुणाचल प्रदेशातील Zero Valley त महिनाभर राहायचे आहे. भारतातील ते प्रदूषणरहित, स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य गाव आहे. भारताचा नायगारा म्हणजे जगदळपूरचा चित्रकूट धबधबा ऑगस्टमध्ये व ऑक्टोबरमध्ये असा दोनदा बघायचा आहे. तो छत्तीसगड या राज्यात आहे. यादी खूप मोठी आहे, मग तिला wish list म्हणा नाहीतर bucket list म्हणा...!
                                                              🪴🪴🪴

Wednesday, August 20, 2025

वाचण्यासारखे काही....

ग्रंथालयांशिवाय लंडनची कल्पना करणेही अशक्य आहे. इथल्या एका ग्रंथालयात ‘चांभार’ (The Chamars : George W. Briggs) हे पुस्तक आहे, यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाने १९२० मध्ये पुस्तक लिहावे ! केवळ एका जातीबद्दल नाही तर आपल्याकडच्या सगळ्या जातींवर, जिल्ह्यांवर इंग्रजी अभ्यासकांनी अभ्यासपूर्ण अशी प्रदीर्घ मांडणी केली आहे, नोंदी ठेवल्या आहेत. इतर कोणी नोंदी केल्या असतील, तर तेही संग्रही ठेवले आहे. एखाद्या साध्या विषयाने खुणावले की त्यात बुडी मारायची आणि निष्ठेने संशोधन करायचे, हा इंग्रज माणसाचा स्वभाव आहे.

इंग्रजांनी जगावर राज्य केले, याची कारणे अनेक असतील. 'दस्ताऐवजीकरण’ त्यापैकी महत्त्वाचे. ज्यांच्यावर राज्य करायचे, तो परिसर-संस्कृती पार कोळून प्यायची, ही त्यांची खासियत. 'डॉक्युमेंटेशन’ हे इंग्रजांचे बलस्थान.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे युरोपात कोपर्निकसनंतर गॅलिलिओ सांगू लागला, तेव्हा त्याला नजरकैदेत राहावे लागले. त्याच कालावधीत संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याची वार्ता आपल्याकडे पसरवली जात होती. मात्र नंतर युरोपातल्या ‘रेनेसॉं’ने तिथले जगच बदलून गेले. रेनेसॉं हा युरोपच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा काळ. अंधश्रद्धा, धार्मिक कट्टरता यांना त्यामुळे धक्का बसला. विज्ञान, विवेक, स्वतंत्र विचार यांना प्रोत्साहन मिळाले. माणसाच्या विचारविश्वाला नवे आयाम मिळाले. याचा सर्वाधिक फायदा इंग्लंडने करून घेतला. 

शिस्तबद्ध अभ्यासाची सवय असल्याने इंग्रज माणसाने अनेक कठीण विषय समजून घेतले. साम्राज्यविस्ताराच्या वाटा शोधल्या. साम्राज्य टिकवण्याचे मार्ग शोधले. प्रशासनावर पकड मिळवली. साहित्य-कला-संस्कृतीचा आवाका मिळवला. एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन तो विषय समजून घेणे, व्यवस्थित नोंदी करणे, गॅझेट्स तयार करणे आणि तर्कसंगत निष्कर्षांपर्यंत पोहोचणे ही त्यांना सवयच लागली. आजही आपल्याकडच्या अनेक घटनांवर, मुद्द्यांवर इंग्रजी अभ्यासक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहितात. 

इंग्रजांनी तेव्हा अवघा भारत मोजला, भूमापन केले. त्यानंतर आजतागायत आपल्याला ते जमलेले नाही. अठराव्या शतकात इंग्रजांनी हा खंडप्राय देश मोजला. ‘The Great Arc : The Dramatic Tale of How India Was Mapped and Everest Was Named' हे पुस्तक वाचले की हा पूर्ण प्रवास समजतो. हे पुस्तकही ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनी लिहिले आहे. विल्यम लॅम्ब्टन नावाचा इंग्रज अधिकारी या भूमापनासाठी आपले सर्वस्व देतो. रानावनात ऊन-वारा-पावसात काम करताना सत्तराव्या वर्षी तिथेच मरण पावतो. त्याची समाधी आजही वर्ध्याजवळ हिंगणघाटला आहे. 

लॅम्ब्टन गेल्यावर त्याचा सहकारी जॉर्ज एव्हरेस्ट ही सूत्रे हातात घेतो. वयाच्या ५६व्या वर्षांपर्यंत अहोरात्र त्यासाठी काम करतो. अभ्यास करतो, तहानभूक विसरून देशभर फिरून सर्वेक्षणे करतो. माउंट एव्हरेस्टला त्याचे नाव द्यावे, एवढे उत्तुंग काम उभे करतो. या धांदलीत लग्न करायचे मात्र राहून जाते. ५६व्या वर्षी एव्हरेस्ट लंडनला परततो. तिथे पबमध्ये बीअर पिताना एका सुंदरीच्या प्रेमात पडतो. २३ वर्षांच्या तरूण मैत्रिणीशी लग्न करतो. सहा मुलांचा बाप होतो ! आपले लोक सार्वजनिक कारणासाठी झोकून देऊन असा अभ्यास करणार नाहीत. पबमध्ये जाऊन छान दारू पिणार नाहीत. ५६व्या वर्षी प्रेमात वगैरेही पडणार नाहीत !

'असा लुटला भारत'  (The Theft of India) हे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक. '१४९८ ते १७६५ पर्यंतची युरोपियन देशांनी भारताची केलेली लूट' असे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. सरिता आठवले यांनी अनुवाद केला असून मेहता प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. दुसरे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे 'अराजक' (The Anarchy) हे होय. 'ईस्ट इंडिया कंपनी : एका व्यापारी कंपनीचा जुलमी कारभार' असे याचे उपशीर्षक असून विल्यम डॅलरिंपल हा लेखक आहे. रेश्मा कुलकर्णी यांनी मराठीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशक मेहता आहेत.

कलकत्ता (कालिकत, कोझिकोडे) मलबार, मद्रास, सुरत, मुंबई, कोचीन, कोरोमंडल, गोवा, चितगाव, पाँडिचेरी, बंगाल इत्यादी ठिकाणी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फेंच यांनी व्यापारासाठी वसाहती केल्या. या सर्वांच्या व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी होत्या. मन मानेल तसा व्यापार आणि लूट करून पैसा मिळवणे हाच त्यांचा उद्देश होता.

पोर्तुगीजांनी अमेरिकेतून इकडे टोमॅटो, बटाटे, अननस, सीताफळ, पपई, निवडुंग, पेरू, पॅरान फ्रूट, काजू, शेंगदाणे, रताळी, मका, मिरची, रातांबा, अल्फाॅन्सो आंबा, तंबाखू, झेंडू (मेक्सिको) भारतात आणले, हे आश्चर्याचे वाटते. गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी दीड हजार खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल उभारले होते. ते अल्बुकर्कने स्थापन केले होते. तेथेच गोव्याला सेंट कॅथेड्रेल चर्च बांधले गेले. भारतातून सोरा (potassium nitrate), नीळ, काळी मिरी, कापड, मसाले युरोपियन प्रदेशात नेले जात. 

त्या काळातील शिवाजीराजे, संभाजीराजे आणि कान्होजी आंग्रे यांचे उल्लेख 'असा लुटला भारत' या पुस्तकात येतात. औरंगजेब, मीर जाफर (बंगाल), चंदासाहेब (कर्नाटक) यांचे उल्लेख आहेतच. १६६२ मध्ये पोर्तुगीजांनी चार्ल्स दुसरा याला मुंबई बेट आंदण दिले. त्याने पोर्तुगालच्या ब्रगांझा घराण्यातील कॅथरीनशी विवाह केला होता.

इंग्रजांनी १६७२ ला मॉरिशसचे डोडो हे पक्षी मारले. त्यांचे एक्सपेरिमेंट नावाचे जहाज तेथे गेले होते. नंतर मॉरिशसमध्ये डोडो पक्षीच नामशेष झाला. इंग्रज थॉमस रो यांने १६१६ मध्ये जहांगीर बादशहाला इंग्लिश घोडागाडी, उंची मद्य व दोन मॅस्टिप जातीचे कुत्रे भेट दिले. हे कुत्रे अतिशय क्रूर असतात. दोन सेवक त्यांना पालखीतून फिरवायला आणि दोन त्यांच्यांवरच्या माशा उडवण्यासाठी होते. त्या काळात साधारण श्रीमंत माणसाकडेही वीस गुलाम असत. विशेषतः ते मलबारमधून विकत घेतले जात. स्त्रियांच्याकडे दासी व पुरुषांच्याकडे गुलाम असत. मात्र तत्काळात भारतात रोगराई, अन्याय, अत्याचार, दुष्काळ, शेतसारा, मद्यपान यामुळे लोकसंख्येचा दर सतत खालावत होता. भारत प्रचंड गरीब होता. इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि फ्रेंचांनी या भारताची जवळ जवळ तीनशे वर्षे लूट केली.

याशिवाय जोनाथन गिल हॅरिसचे 'द फर्स्ट फिरंगीज' हे पुस्तकही वाचण्यासारखे आहे. रेखा देशपांडे यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. अना फेल्ड हाऊस यांचे 'नदी आणि स्त्रीत्व' हे पुस्तक विजया देव यांनी अनुवादित केले आहे. ही दोन्ही पुस्तके पद्मगंधा प्रकाशनने प्रकाशित केलेली आहेत. टोनी जोसेफ यांचे 'द अर्ली इंडियन्स' आणि युवा नोआ हरारी यांचे 'सेपियन्स' (मानवजातीचा संक्षिप्त इतिहास) ही दोन्ही पुस्तके आपल्या ज्ञानात अधिकच भर घालतात. अशी खूप पुस्तके आहेत पण त्यांच्याविषयी आणखी केव्हातरी...!


(सुरुवातीच्या 'चांभार' या पुस्तकाबद्दलचा मजकूर संजय आवटे यांचा आहे.)
                                     🪴

Wednesday, August 6, 2025

गवळी समाज

महाराष्ट्रातील हिंदु गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भातशेती हाच आहे.कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख.

पुरुष : कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे.
स्त्रिया : गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे.

कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब.

स्त्रियांमध्ये नाकात मोठी नथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात.

गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा बाल्याचा नाच आणि स्त्रियांचा फेऱ्यांचा नाच हे नृत्यप्रकार.

तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज.मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे.

याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे.यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले.

कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले.

सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते.

खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटीश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली.

माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती.

कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले.

कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या.​छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याच्या कालखंडात व नंतर मराठेशाहीच्या काळात गवळी, कुणबी, आगरी, कोळी समाजाने सहभाग व सहकार्य केले होते. आजही राजधानी रायगड किल्ल्याच्या आजूबाजूला गवळी समाजाची अनेक गावे आहेत.भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून ‘गवळी’ हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत.

जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी हे आहे.

सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत.गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय.

गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात.

कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, विन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात.समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहेगवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो.

लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो.

समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात.

लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा सतिर (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते.

कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले.

समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे.


कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे.

गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे.गवळी लोकांतील गावे व आडनावे
(आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड,चरई)

मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्हा...आवासकर, आईनकर, कोटकर, कोदेरे , काटेकर, काते, कासार, किलजे, कांबळे, कोंडेरे, काटले, कापदुले, कलांबकर, केलस्कर, टोपरे, केसरकर, खताते, खरपुडे, खेडेकर, खवलेकर, गवळी, गायकर, गोरीवले, गोपाळे, घाटवळ, ठसाळ, घोले, चाचे, चिले, चोगले, चौकेकर, टावरे, ठाणके, डायरे, डाकरे, डिगे, ढगे, तरेकर, तटकरे, तळकर, तिसकर, तांबडे, दर्गे, दुर्गवळी, दळवी, दिवेकर, दुखले, दुर्गावळे, दिघीकर, दाभोळकर, धुमाळ, नटे, नारिंगकर, पाटील, साबळे, पंदेरे, पवार, पागार, पगडे, पाटगे, पाटे, बांडागळे, बाठे, बिरवटकर, बिरवाडकर, बोबडे, बोरे, भुरण, भालेकर, भेसरे, भोजने, मांदाडकर, महागावकर, महाडीक, माटे, मिरगळ, मोडशिंग, सारंगे, साईकर, यादव, राईन, रायगवळी, रिकामे, लटके, लाड, लेपकर, वरणकर, वरेकर, वाजे, शिवकर, शिंदे, करंजकर, शिळीमकर,हिवरकर.देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर,इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ

गवळी लोकांची जुन्या पिढीतील नावे
पुरुषांचीः- कान्हा, काळू, केरू, गोमा, गोईन, गोंदया, गौरु, गणू, गंग्या, जानू, धर्मा, तानु, दोरक्या, दामु, धाकटू, धोंडू, पदू, पंड्या, पोशा, बारक्या, बाळा, बेंडू, बंडया, बेमट्या, सुडक्या, सोनू, चांगो, भिकू, भिमा, महादू, लखु, राघो, रामा, येशा, वालकू, विठू
समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे जी किंवा राव लावत असत.

उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव.

बायकांचीं:- कुंदा, काळी, गुणी, गंगा, चंद्री, जनी, ठकू, तानी, दोरकी, देऊ, धाकटी, धोंडी, नामी, पंडी, पिठी, पारबती, बाया, बारकी, भागु, भिमा, भिकी, महाली, मंदा, राजी, रोंगी, विठा, शांती, सखू, सोनी, हिरा, येस्वदा, येशी इ.
लग्नानंतर मुलींचा नावापुढे बाई लावले जात असे.

उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई.

                                       🪴

Saturday, August 2, 2025

आता आमोद सुनास जाले...

दिठी हा चित्रपट मार्च २०२१ मध्ये आला. आता आमोद सुनास आले  या दि. बा. मोकाशी यांच्या कथेवर. दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचा. दोघी या चित्रपटानंतर !  याच्याशी निगडीत एक जुना लेख...! विजया पवार यांचा. 

आंध्रात फिरायला गेलो होतो. तेंव्हा काळहस्तीश्वर मंदिरात जाण्याचा योग आला होता. तिथून परत आलो आणि एकदा मॅजेस्टिक मध्ये पुस्तकं चाळत असताना "श्री वेंकटेश्वर आणि श्री काळहस्तीश्वर" अश्या नावाचे पुस्तक दिसले. लेखक होते रा चिं ढेरे. तेंव्हा पेपरात त्यांच्या "श्री विठ्ठल एक महासमन्वय" या पुस्तकाची जाहिरात येत होती. कुतूहल होते म्हणून दोन्ही पुस्तके घेतली आणि घरी आलो. वेळ मिळाला तसे विठ्ठलाचे पुस्तक वाचायला काढले. पण मन काही रमेना. मग वेंकटेश्वराचे पुस्तक काढले. तिथेही माझा लेखकाशी सूर जुळेना. म्हणून मग पुस्तके बाजूला ठेवली. 

माझं असं कधी कधी होतं की पुस्तकाशी माझी नाळ जुळत नाही. मग मी पुस्तकाला आणि स्वतःला त्रास देत नाही. बहुतेक त्या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आलेली नाही असे म्हणून ते बाजूला ठेवतो. यथावकाश ते पुस्तक मला बोलावतेच. अश्या प्रकारे पुस्तकाने साद घातलेली असली की ते अगदी कडकडून भेटते. त्यातले विचार अगदी सहज समजतात आणि त्यावर मनातल्या मनात संवाद देखील छानपैकी सुरू होतो असा माझा अनुभव आहे. त्या अनुभवाला स्मरून मी ढेरे सरांची पुस्तके शेल्फवर ठेवून दिली. 

मागच्या महिन्यात निर्गुणी भजनांची सिरीज लिहिताना गोरक्षनाथांचा उल्लेख केला होता. त्यावर एका वाचकाशी साद प्रतिसाद करत असताना त्या वाचकाने रा चिं ढेरेंचे "नाथ संप्रदायाचा इतिहास" हे पुस्तक वाचा असा सल्ला दिला होता. आणि मग शेल्फवरील ढेरे सरांची पुस्तके साद घालू लागली. म्हटलं, "आनंदा, वेळ झाली बहुतेक या पुस्तकांची". पण चाल ढकल करत होतो. तेव्हढ्यात ढेरे सर इहलोक सोडून गेल्याची बातमी आली. एक दोन मित्रांनी सरांच्या सर्व ग्रंथसंपदेचे फोटो फेसबुकवर टाकले. त्यात नाथ संप्रदायाचा इतिहास दिसले. आणि मग मात्र मी मॅजेस्टिक मधे गेलो. तिथून ढेरे सरांची सगळी पुस्तकं घेतली. पण वाचायला सुरवात केली ती नाथ संप्रदायाच्या इतिहासाकडून. 

मला माझे मडके कच्चे आहे ते माहिती आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होती. अजून या पुस्तकाची माझ्या आयुष्यात वेळ आली की नाही? त्यातले विचार समजण्याइतका मी तयार झालो की नाही? असे प्रश्न मनात होते. कदाचित निर्गुणी भजनांवर लिहीत असताना वाचनाला आणि विचाराला दिशा मिळाली असेल त्यामुळे पुस्तक माझ्याशी बोलू लागले. आणि ते काय बोलत आहे ते मला समजू लागले. ढेरे सरांचा प्रचंड व्यासंग आणि विचार मांडण्याची अनाग्रही पद्धत जाणवत होती. एका ज्ञानतपस्व्याच्या जवळ आपण बसलो आहोत असा अनुभव होत होता. 

वाचता वाचता पान एकतीस वर आलो. त्यात पिण्ड ब्रह्माण्ड या विषयावरचा गोरक्षनाथांचा सिद्धांत या मुद्द्यावर बोलताना ढेरे सरांनी ज्ञानोबा माउलींच्या अमृतानुभवातील नवव्या प्रकरणातील आत्मरतिचे वर्णन करणारी रचना दिली आहे. त्या रचनेचे पहिले वाक्य वाचले आणि एकदम ज्ञानतपस्वी ढेरे सर प्रेमळ अनुभवी मित्रासारखे झाल्यासारखे वाटले. ढेरे सरांनी दिलेली माऊलींची ती पूर्ण रचना आधी देतो आणि मग त्यामुळे माझ्या एका जुन्या कोड्याची उकल कशी झाली ते सांगतो. 

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ।
आरिसे उठिले । लोचनेंसी ।।
आपलेंनि समीरपणे । वेल्हावती विंजणे ।
कीं माथेंचि चांफेपणें । बहकताती ।।
जिव्हा लोधली रासे । कमळ सूर्यपणे विकासे ।
चकोरचि जैसे । चंद्रमा जालें ।।
फुलेंचि जालीं भ्रमर । तरुणीची जाली नर ।
जाले आपुलें शेजार । निद्राळुची ।।
चूतांकुर जाले कोकीळ । आंगचि जाले मलयनिळ ।
रस जाले सकळ । रसनावंत ।।
तैसे भोग्य आणि भोक्ता । दिसे आणि देखता ।
हे सारले अद्वैता । अफुटामाजी ।।

यातलं "आमोद सुनांस जाले" वाचलं आणि शाळेपासून पडलेलं कोडं सुटेल असं वाटू लागलं. पुलंचा माझे खाद्यजीवन म्हणून फार प्रसिद्ध लेख आहे त्यात एका ठिकाणी पुलं म्हणतात, " जो भात खदखदू लागला म्हणजे प्रियकराचे प्रेयसीवरचे लक्ष उडून आमोद सुनांस होते, त्याला काय पोषक अन्न या वैद्यकीय कोषात कोंबायचे?" हे वाक्य जेंव्हापासून वाचलंय तेंव्हापासून जीव अडकलाय. कारण आमोद सुनांस येणे याचा काही संदर्भ मिळत नव्हता. बरं आपल्या पद्धतीने अर्थ लावायचा प्रयत्न करावा तर आमोद म्हणजे आनंद. मग आनंद सुनांस येणे म्हणजे काय ते कधीच कळले नव्हते. आणि इथे नाथसंप्रदायाचा इतिहास वाचताना ढेरे सरांनी माझ्यासाठी अगदी अनपेक्षितपणे पूर्ण रचना दिली होती. आता पुलंच्या वाक्याचा संदर्भ मिळाला होता. पण अजूनही आनंद सुनांस येणे याचे कोडे सुटत नव्हते. आणि पुलंनी हे वाक्य भात शिजण्याशी कसे जोडले ते काही लक्षात येईना. तसाच झोपलो. 

सकाळी, संदर्भ मिळाला आहे या आनंदात उठलो. पण अर्थ लागायचा बाकी आहे ते आठवले. मग माझ्यातला आळशी माणूस जागा झाला. ढेरे सरांच्या पुस्तकातील आणि पुलंच्या हसवणूक या पुस्तकातील त्या पानांचा फोटो घेतला आणि दोन मित्रांना पाठवला. एक माझ्या सारखा पुलंप्रेमी तर दुसरा जुन्या मराठी भाषेचा जाणकार. म्हटलं काय अर्थ लागतो का ते सांगा. भाषापटू मित्राने अजून माझा मेसेज बघितला नसावा तर पुलं प्रेमीने लगेच सांगितले की, 'बाबा रे, मला पण याचा अर्थ अजून लागला नाही." 

मग थोड्या वेळाने त्याचा पुन्हा मेसेज आला. 'ते आमोद सुनांस "जाले" आहे. सगळे त्याला "आले" म्हणतात. म्हणून मला कळत नव्हते. आता जर तो शब्द "जाले" आहे हे नक्की झालंय तर बहुतेक त्याचा अर्थ "श्रोत्यांस आनंद झाला " असा असणार". मला थोडे पटले आणि थोडे नाही. तेव्हढ्यात अजून एका जाणकार मित्राचा फोन आला. त्याला म्हटलं फोटो पाठवतो. अर्थ सांग. त्याला हे पण सांगितलं की एका मित्राने श्रोत्यांस आनंद झाला असा अर्थ सांगितला आहे. फोटो पाठवले आणि लेक्चरला गेलो. मग दिवसभर आयकर कायदा आणि त्याच्यातील कलमे शिकवताना विषय विसरलो. रात्री जाणकार मित्राचा फोन आला. तो म्हणाला श्रोत्यांचा संबंधच नाही. कारण अमृतानुभव म्हणजे श्रोत्यांशी साधलेलया संवादाचे वर्णन नसून ज्ञानेश्वरांना आलेल्या अमृततुल्य अनुभवांचे वर्णन आहे. हे मला पटले. पण तो ही "सुनांस जाले" या शब्दांचा अर्थ देऊ शकला नाही. 

आता माझी अवस्था स्टेशन जवळ आलेले आहे, फलाट दिसू लागलेले आहेत, आपण आपले सामान सुमान घेऊन पॅसेंजर ट्रेनच्या छोट्याश्या दरवाजाजवळ उभे आहोत, पण गाडी स्टेशन बाहेर सिग्नलला थांबल्यावर होते तशी झाली होती. मग आठवण झाली ती संध्याताई सोमण यांची. फेसबुकवर अनेक ठिकाणी कमेंट करताना त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांचे फोटो टाकतात ते आठवले. मग त्यांना फेसबुकरच फोटो पाठवले. आणि म्हटलं "आमोद म्हणजे आनंद हे कळले आहे पण ते सुनांस आले चा अर्थ सांगू शकाल का?" पण मग लक्षात आलं की मी त्यांचा मित्र नाही आहे. स्पॅम टाळण्यासाठी झुक्या बाबा मित्र नसलेल्या लोकांचे मेसेज लगेच दाखवत नाही तर त्याला मेसेज रिक्वेस्ट म्हणून पाठवतो. आणि या रिक्वेस्ट बऱ्याचदा उघडल्या जात नाहीत हे माझ्या स्वानुभवावरून मला माहीत होते. मग संध्याताईंना मित्र विनंती पाठवली. आता त्या कधी ऑनलाईन येतील? कधी मित्रविनंती स्वीकारतील? कधी माझा मेसेज बघतील? आणि कधी उत्तर देतील? या प्रश्नांच्या आवर्तात सापडून शेवटी मी आळस सोडला आणि गुगल वर "आमोद सुनांस जाले" असे शोधायला सुरवात केली. 

तर तिथे मराठी साहित्य ब्लॉगस्पॉट इन या संकेतस्थळावर, दि बा मोकाशी यांच्या "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे रसग्रहण सापडले. त्यात ब्लॉग लेखकाने एका परिच्छेदात माझ्या शंकेचं निरसन केलेलं होतं. तो परिच्छेद असा आहे, 

"कथेविषयी लिहिण्याआधी थोडेफार शीर्षकाविषयी सांगणे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांची 'आता आमोद सुनासि आले। श्रुतीशी श्रवण निघाले' ही अमृतानुभवातल्या 'ज्ञान-अज्ञान भेद कथन' या प्रकरणातील ही ओवी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा आणि जे जाणायचे ती गोष्ट) यांच्यातील अद्वैत दर्शविते. आमोद म्हणजे सुगंध, सुनास म्हणजे नाक - हे एक उदाहरण. या कथेतही वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या गोष्टींतले द्वैत - अद्वैत लेखक दाखवून देतो"

सगळा घोटाळा आमोद म्हणजे आनंद या समजुतीमुळे झालेला होता. आमोद म्हणजे आनंद असा जरी अर्थ असला तरी आमोद या शब्दाला अजूनही अर्थ असू शकतात ही शक्यताच मी विचारात घेतली नव्हती. त्यामुळे पुढे सुनांस आले किंवा जाले चा अर्थ लागत नव्हता. आता जेंव्हा आमोद म्हणजे सुवास असा अर्थ घेतला तेंव्हा सुनांस म्हणजे नाक हा अर्थ लागला. आणि मग सुनता है गुरु ग्यानी या निर्गुणी भजनात कबीर कुंडलिनी साधकाच्या अवस्थेचे वर्णन करत आहेत हा मला लागलेला अर्थ आणि त्याच अवस्थेचे माउलींनी आमोद सुनांस जाले असे केलेले वर्णन एकदम जुळून आले. जेंव्हा साधकाची कुंडलिनी जागृत होते, तेंव्हा त्याला जो अनिर्वचनीय आनंद होतो त्या अमृतानुभवाचे वर्णन करताना माउली म्हणतात. 

सुवासच नाक होतो आणि स्वतःला भोगू शकतो. ध्वनीच कान होतो आणि स्वतःला ऐकू शकतो. आरसा डोळे आणि दृष्टी एकरूप होतात. माथा स्वतः चाफयाप्रमाणे सुगंधीत होतो. जीभ स्वतःच चव बनते, चकोर स्वतःच चांदणे आणि चंद्र बनतो, फुले स्वतःच भ्रमर बनतात, तरुणी स्वतःच नर बनून स्वतःचे स्त्रीत्व उपभोगू शकते. थोडक्यात सगळे रस आणि त्या रसांचे रसपान करणारे एकरूप होतात. त्यांचे अद्वैत होते. ज्याला भोगायचे आहे आणि जे भोगायचे आहे ते हे दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचे आहे आणि जे जाणायचे आहे ते एकरूप होतात. आणि हा अमृतानुभव असतो. असा या रचनेचा अर्थ आहे. 

आता माझी गाडी फलाटाला लागली होती. मन शांत झाले होते. मी शाळेत असल्यापासून पुलंनी घातलेले कोडे पण सुटले होते. भात शिजताना जो सुगंध दरवळतो त्यामुळे जणू तो वासच नाक होतो. वासाचे आणि नाकाचे वेगळे अस्तित्व उरत नाही. त्या दोघांचे अद्वैत होते. खरा खवैय्या प्रियकर मग तो सुवास उपभोगतो आणि त्यात इतका एकरूप होतो की तो आपल्या प्रेयसीला देखील विसरतो. 

आणि मला जाणवले की; माउली, कबीर, नाथ संप्रदाय, आणि पुलं यांना सगळ्यांना एका माळेत गुंफून ढेरे सरांनी आंतरजालाने मला एका मोठ्या रोलर कोस्टर राईडचा अनुभव दिलेला होता. तो माझ्यासाठी अतिशय रोमहर्षक होता. मला वाटले संपली राईड. म्हणून खूष होऊन फेसबुकवर आलो. तर संध्याताईंनी मित्र विनंती स्वीकारली होती. मग त्यांना हा अर्थ सांगून तो बरोबर आहे का अशी विचारणा केली. तर त्यांनी दुजोरा देताना त्यांच्याकडील एका पुस्तकाचा फोटो पाठवला. पुस्तकाचे नाव होते "अनुभवामृतातील प्रतिमासृष्टी" लेखिका "सई देशपांडे" फोटोत दिसणारे पण वाचले. आपल्याला लागलेला अर्थ बरोबर आहे याचा आनंद झाला. आणि अजून एक गंमत दिसली. एका देशपांडेंनी आपल्या पुस्तकात घातलेले कोडे शेवटी दुसऱ्या देशपांडेंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या दुजोऱ्याने खात्रीलायक सुटले. 

आता ढेरे सरांचे पुस्तक खाली ठेववत नाही. विकत आणून ठेवलेली त्यांची सगळी पुस्तके मला बोलावत आहेत. बहुतेक त्या पुस्तकांची माझ्या आयुष्यातील वेळ सुरू झाली असावी. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते की हे सर्व, ढेरे सर इहलोक सोडून गेल्यावर घडले. आणि त्याच बरोबर थोडा आनंद देखील वाटतो की उशीरा का होईना पण मला त्यांच्या पुस्तकातील विचार थोडे फार समजू शकतील.

                                      🪴

Thursday, July 3, 2025

एक वर्ष....!

             पंछी नदिया पवन के झोंके । 
             कोई सहरद ना उन्हे रोके॥

याचप्रमाणे मनाला, इच्छाशक्तीला कोण अडविणार ? ते कधीच कोल्हापुरात पोचले होते. मधल्या काळात नोकरी केली असे वाटलेच नाही. त्याच उत्साहात एक वर्ष सरले. अगदी सुरुवातीलाच प्रति पंढरपूर असलेल्या कोल्हापुरातील नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी केली. जाता येता हे अंतर बारा किलोमीटर होते. 

नंतर पुढे काही दिवसातच पीएच डीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडाभर विद्यापीठात व्याख्याने दिली. त्यांच्या विषयांची खूपशी चर्चा केली. 'मुद्रितशोधन' या कोर्समध्ये व्याख्याने झाली. आंतरविद्याशाखीय संशोधनावर PM USHA अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या परिसंवादात व्याख्यान झाले. नाशिकच्या मुक्त विद्यापीठाकडून बी ए साठी एक पुस्तक लिहा, म्हणून फोन पत्र आले. अर्थातच मी पूर्वी लिहिले असल्याने होकार दिला. मग 'मराठी शाहिरी व बखरगद्य' हे पुस्तक लिहून पूर्ण केले. ही प्रक्रिया दररोजची इतर कामे करून दोन महिने चालली. मोठी आनंददायी गोष्ट होती ती. ते लिहिताना पानिपतची गोष्ट आलीच. जानेवारी, १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. सकाळी अकरापर्यंत मराठ्यांची सरशी होत होती. पण मलकाजमानीने अहमदशहा अब्दालीच्या सैन्याला उत्साहित केले. मग झालेल्या घनघोर युद्धात मराठे हरले. कोण ही मलकाजमानी ? असा मोठा प्रश्न पडला. शोध लागायला पंधरा दिवस लागले. मलिका उझ जमानी (युग की राणी) हा किताब आहे. तो शहाजहानने मुमताजला दिला होता, तसेच औरंगजेबाचा नातू महंमदशहाने (रंगीला) आपल्या बादशाह बेगमेस मलिकाजमानी हा किताब दिला होता. महंमदशहा २६ एप्रिल, १७४८ रोजी तर त्याची ही बेगम १४ डिसेंबर, १७८९ मध्ये निधन पावली. औरंगजेबाची मुलगी झेब उन निसा (झेबुन्निसा) आणि बादशाह बेगमेस मृत्यूनंतर दिल्लीत तीस हजारी बाग येथे दफन केले आहे. सध्या दिल्लीत तीस हजारी बाग या नावाचे न्यायालय आहे.

नंतर शिवाजी विद्यापीठाच्या बी ए मराठी अभ्यासक्रमाची मराठी भाषेचे अंतरंग आणि साहित्याची रूपे ही दोन पुस्तके संपादित केली. डॉ. रमेश साळुंखे (देवचंद, अर्जुननगर) यांनीही सहकार्य केले. मराठी भाषेचे अंतरंग चे SIMचे लेखनही केले. एका गौरवग्रंथासाठी 'वारकरी भाषा आणि संस्कृती' हा लेख लिहिला. दैनिक सकाळसाठी 'कोल्हापुरी बोली : तत्त्व आणि व्यवहार' (डॉ. एकनाथ आळवेकर) आणि 'अमृतमंथन' (डॉ. सुनीलकुमार लवटे गौरवग्रंथ) या दोन ग्रंथांवर परीक्षणे लिहिली. मराठी संशोधनाच्या नव्या वाटांवर 'मराठीचे संशोधन : आंतरविद्याशाखीय' हा लेख शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या शिविम पत्रिकेत लिहिला. महाराष्ट्र शासनाच्या एका उपक्रमाच्या पुस्तकात 'मराठी भाषा : रोजगाराच्या संधी' हा लेख लिहिला. त्याच स्वरूपाचे भाषणही महावीर महाविद्यालयात झाले होते. ही नेहमीचीच कामे आहेत, त्यात नवीन असे काहीच वाटले नाही. 

दिन डुबे है या डुबे बारात लिये कश्ती, साहिल पे मगर कोई कोहराम नही होता॥ असे म्हणणाऱ्या मीनाकुमारीची शायरी अचानक सापडली, मग काही दिवस या शायरीच्या होशातच गेले. (होश = अच्छी तरह से रहना) Tragedy Queen अभिनेत्री मीनाकुमारीची ही शायरी...

ये रात ये तन्हाई, ये दिल के धड़कनों की आवाज़
ये सन्नाटा, ये डूबते तारों की ख़ामोश गज़ल ख़्वानी 

ये वक़्त की पलकों पर सोती हुई वीरानी
जज़्बात-ए-मुहब्बत की ये आख़िरी अंगड़ाई 
बजाती हुई हर जानिब ये मौत की शहनाई 

सब तुम को बुलाते हैं पल भर को तुम आ जाओ 
बंद होती मेरी आंखों में मुहब्बत का 
एक ख़्वाब सजा जाओ..!

विनोदकुमार शुक्ल यांना साहित्य अकादमी प्राप्त झाली. त्याचे 'दिवार में एक खिडकी राहती थी' ही कादंबरी वाचली. त्याच वेळी नेटफ्लिक्सवर लिला (leila) ही पाच भागाची मालिका बघितली. त्यामुळे दिल्लीतील पत्रकार प्रयाग अकबरची 'लैला' कादंबरीही वाचली. मालिका त्याच कादंबरीवर आधारित आहे. मग नेटफ्लिक्सवरच्या American Manhunt : Osama Bin Laden आणि चंदन तस्कर The hunt for Veerappan या मालिका भारीच होत्या. Sonyliv वरील Scam 2003 : The Telgi Story  (Abdul Karim Telgi) ही स्टॅम्प पेपर घोटाळ्याची मालिका, एक साधा पण हुशार माणूस काय करू शकतो हे दर्शविते. Discovery Science वरील India's Space Oddsy या भागात होमी भाभा, विक्रम साराभाई, सतीश धवन, के. शिवन, अनुराधा, माधवन यांचे संदर्भ घेऊन थुम्बा ते श्रीहरिकोटा हा भारताचा अवकाश प्रवास खूप छान मांडला आहे. 

जे जे उत्तम ते ते पाहिले. एक उनाड दिवस, आपला माणूस, अंधाधुंद, दसवी, महाराज, लकी भास्कर, श्रीकांत असे हिंदी-मराठी चित्रपट खूप छान आहेत. स्वामी अँड फ्रेंड्स आणि मालगुडी डेज : द वेंडर ऑफ स्वीट्स या आर के नारायण यांच्या लेखनावरील मालिका आपणास सर्व जुन्या वळणाच्या इंग्रजी काळात घेऊन जातात. Snack attak, Piper या शॉर्ट फिल्म्स तर भारीच होत्या. Tom Hanksचा The Terminal हा चित्रपट Steven Spielbergने दिग्दर्शित केला आहे. या दोघांचे कितीतरी चित्रपट चांगले आहेत. Cast Away त्यातीलच. The Gorge हा एक अतिशय उत्तम विज्ञान चित्रपट (sci-fi movie) होता. Flow व Moana 2 हे चित्रपट ॲनिमेटेड होते. ऑस्कर पुरस्कारप्राप्त The Beatiful Mind हा जाॅन नॅशचा मस्त चित्रपट. जॉन नॅश हा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त प्राध्यापक होता. त्याचे एकाच मुलीशी दोनदा लग्न झाले. २०१५ मध्ये कार अपघातात दोघे पतिपत्नी निधन पावले. त्याची भूमिका रसेल क्रो या अभिनेत्याने केली आहे. हा चित्रपट पाहणे आनंददायी होते. Flow, Moana 2 व आर के नारायण यांचे लेखन सोडल्यास सगळे चित्रपट व मालिका कोणत्या ना कोणत्या वास्तव घटनेवर आधारित होत्या, कादंबऱ्यांवर आधारित होत्या. Damsel हा एक भयानक, विचित्र पण बरा चित्रपट आहे.

कोल्हापुरात हौशी व बिनधास्त लोकांचा भरणा आहे. वकील, डॉक्टर, गृहिणी, बिल्डर यांनी हौसेने सादर केलेली गाणी म्हणजे देवल क्लब येथील रिदम ग्रुप प्रस्तुत 'दिवाना हुआ बादल' हा गाण्याचा कार्यक्रम होय. अर्थात हा कार्यक्रम हौसेखातर एक लाखभर रुपये खर्च करून सर्वांसाठी मोफत होता. देवल क्लबचे नाट्यगृह अतिशय उत्तम आहे. संकर्षणची दोन नाटके एक 'कुटुंबकीरररतन' आणि दुसरे 'नियम व अटी लागू' पाहिले. पहिले केशवराव भोसले नाट्यगृह येथे व दुसरे आनंदभवन (सायबर) येथे. आनंदभवन हे नाट्यगृहसुद्धा भव्यदिव्य आहे. अगदी अलिकडेच प्रशांत दामले यांचे 'शिकायला गेलो एक' हे विनोदी नाटक पाहिले. द मा मिरासदार यांच्या 'व्यंकूची शिकवणी' या कथेवर आधारित हे नाटक भन्नाट आहे. प्रशांत दामलेचा अभिनय बघण्यासारखा आहे. त्यातील 'सुख म्हणजे काय असतं...' हे गाणं उत्तमच. खरेतर सुख म्हणजे नक्की काय असतं? हे प्रशांत दामले यांनी गायलेले प्रसिद्ध मराठी गाणे, जे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात आहे. प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांनी यात एकत्र काम केले आहे. ते गाणं असं...

'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं !
दान घेतानाही झोळी हवी रिकामी,
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली,
आपण फक्त घेताना लाजायचं नसतं.
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,
हवंय? नको ! ते म्हणणं प्रश्‍नच नसतो.
आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं.' 

महाराष्ट्र कलोपासक राज्य स्पर्धेतील पुरुषोत्तम करंडकच्या स्पर्धेत सांघिक एकांकिकेत कोल्हापूरच्या कॉमर्स कॉलेजने 'यात्रा' एकांकिका सादर केली तर प्रायोगिक स्पर्धेत लॉ कॉलेजने 'कलम ३७५' एकांकिका सादर केली. दोन्ही एकांकिका त्यांच्या त्यांच्या गटात प्रथम आल्या. त्या एकत्रितपणे देवल क्लब येथेच पाहायला मिळाल्या. अमोल पालेकर सुद्धा शाहू स्मारक येथे दमसाच्या पुरस्कार वितरण प्रसंगी आले होते. 

पुस्तके किती वाचली कुणास ठाऊक. सांस्कृतिक, वाङमयीन अशा कितीतरी कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. प्रदर्शने पाहिली, व्याख्याने ऐकली. शाहू महाराज, जयसिंगराव पवार, सुरेश द्वादशीवार, विवेक सावंत, सदानंद मोरे, टी एस पाटील, दिलीप चव्हाण, ज्ञानेश्वर बंडगर, श्रीरंग गायकवाड, इस्माईल पठाण, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के, बी एम हिर्डेकर, अवनीश पाटील, रवींद्र इंगळे, अमोल पालेकर (मुलाखत) यांची भाषणे ऐकली.  

'एक उनाड दिवस' हा अशोक सराफ यांचा चित्रपट पाहिला आणि लगेचच त्यांना पद्मश्री मिळाल्याची बातमी आली. सगळे चित्रपट आणि मालिका अर्थातच ओटीटीवर...! बऱ्याच जमेल त्या कार्यक्रमांनाही हजेरी लावली. दिलिप कुलकर्णी (पत्नी पौर्णिमा) या कोकणातील अवलियाच्या पर्यावरणाची जाण वाचली. मनोजकुमार, जयंत नारळीकर यांनी या जगाचा निरोप घेतला. जयंत नारळीकर यांना २०१५ मध्ये शिवाजी विद्यापीठात भेटलो होतो. 

आणखी खूप काही आहे, आता बस इतकेच...!
                                       🪴

                                                                  

Tuesday, January 28, 2025

मराठी भाषा : रोजगाराच्या संधी

' मराठी भाषा : रोजगाराच्या संधी ' 

कोल्हापूर जिल्हा 

डॉ.अनिल गवळी 
(माजी अधिष्ठाता, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) 

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि कोल्हापूरचे महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. यामध्ये ३६ जिल्हे ३६ व्याख्याने या अंतर्गत 'मराठी भाषा : रोजगाराच्या संधी' या विषयावर मार्गदर्शन होत आहे. या उपक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उषा पाटील, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी संदीप साबळे आणि शरद यादव तसेच शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आणि महाविद्यालयाच्या मराठी विभागातील सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रहो....

भाषा म्हणजे विचार, मत आणि भावना एकमेकांशी व्यक्त करण्यासाठी अथवा मनाशीच व्यक्त करण्यासाठी केलेला संवाद होय. माणूस बोलतो त्या पाठीमागे सामाजिक संकेत असतात. ध्वनि, अक्षरे व शब्द यांची रचना असते. इंग्रजीमध्ये २६ ध्वनी आहेत तर मराठीमध्ये ५२ ध्वनी आहेत. प्राणी सुद्धा बोलतात, त्याच्यामध्ये हत्ती, मोर कुत्रा इतकेच काय मधमाश्याही बोलतात. मात्र हरीण वाघाचा आवाज काढू शकत नाही. मनुष्य मात्र सर्वांच्या नकला करू शकतो. जर लिपीच नसती तर काय झाले असते ? त्यावेळी हावभावाची भाषा होती. अर्थात भाषा ही देणगी नाही. ती शिकावी लागते. त्याचप्रमाणे जगभरात सहा हजार भाषा आहेत. भारतामध्ये साधारण आजमितीला बोलीभाषेसह आठशे भाषा शिल्लक आहेत. महाराष्ट्रामध्ये ६५ भाषा आहेत. त्याच्यामध्ये कोल्हापुरी, चंदगडी, सोलापुरी, मालवणी अशा बोलीभाषा आहेत. भाषांचे सर्वेक्षण झालेले आहे. त्याचे दोन मोठे प्रयत्न आहेत. १८९८ ते १९२८ या कालखंडामध्ये जॉर्ज अब्राहम गिअर्सन या आयरिश व्यक्तीने पहिले भाषिक सर्वेक्षण केले होते; दुसरे म्हणजे 'भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण'. बडोद्याचे गणेश देवी यांनी भारतातील एकूण आठशे भाषा व बोलीभाषा यांचे संकलन केलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा १७ वा खंड आहे. फॅमिलीज ऑफ लँग्वेजेस म्हणजे भाषाकुल असतात. इंडो युरोपियन हा सर्वात मोठा गट आहे. याच्यामध्ये संस्कृत, मराठी,  इंग्रजी,हिंदी, स्पॅनिश, रशियन, पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, जापनीज, डच अशा उत्तम उत्तम भाषा येतात. जगामध्ये मेंडोरीन ही चिनी तिबेटियन भाषा गटातील एक नंबरची भाषा आहे. त्यानंतर स्पॅनिश, इंग्रजी हिंदी या भाषांचा क्रम लागतो. मराठी ही पंधराव्या-सोळाव्या क्रमांकाची भाषा असून जगभरामध्ये एकूण १४ कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी का सांगायच्या ? आपणास वाटते की हळूहळू आपली मराठी कोणी बोलणार नाही. पण भाषा टिकवणे हे आपलेच काम आहे. १४ कोटी लोक बोलतात म्हणजे मराठी भाषा नष्ट होणार नाही. तसेच ती पहिल्या वीस क्रमांकात येणारी भाषा असल्याने टिकून राहणारी भाषा आहे. अगदीच उदाहरण द्यायचे तर कॅनडासारख्या देशांमध्ये इंग्रजी आणि फ्रेंच यांच्या बरोबरीने तिसरी भाषा पंजाबी भाषा आहे. जी भाषा बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही, स्वतःचे मत मांडू शकत नाही, स्वतःचे व्यक्तिमत्त्व उभारण्यास अपुरी पडते ती भाषा समाज सोडून देतो असे म्हटले जाते. मराठीचे तसे नाही. २१ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत जगभरात ३०० भाषा राहतील त्यात आपली मराठी ही एक भाषा असेल. मराठी समाज व समाज माध्यमावर ती राज्य करते. महाराष्ट्राच्या राजकारणाची व न्यायालयाची भाषा इंग्रजी बरोबरच मराठी आहे. ती अतिशय सर्जक व सुंदर आहे. तिला अडीच हजार वर्षाची बोलीची व साहित्याची परंपरा आहे; म्हणून ती अभिजात आहे. 'अवघाचि संसार सुखाचा करीन' असे म्हणणारे ज्ञानेश्वर अथवा 'लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा' असे म्हणणारे तुकाराम या भाषेचे पाईक आहेत. या भाषेतील संधी आपण जाणून घेऊ या....

प्रथमत: भारतासारख्या बहुभाषिक देशात अनेक भाषा आपणाला शिकाव्या लागतील. जगातील इतरही महत्त्वाच्या भाषा शिकाव्या लागतील. आपण मराठी भाषिक आहोत म्हणजेच आपणाला मराठी बरोबरच हिंदी, पंजाबी, गुजराती या भाषा येतात असे गृहीत धरावे लागेल. त्याचबरोबर फ्रेंच, रशियन, इंग्रजी, जापनीज, जर्मन, स्पॅनिश यापैकी दोन भाषा आपणाला शिकाव्याच लागतील. म्हणजेच साधारण मराठीसह चार ते पाच भाषा आपणाला शिकाव्या लागतील. त्यामुळे आपणाला मराठीतील व इतर भाषेतील रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. त्यात सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे ते अनुवादाचे. जगभरामध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. त्याच्यामध्ये विशेषतः भारतात साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, राज्य मराठी विकास संस्था त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे भाषा संचालनालय अथवा मराठी भाषा विभाग हे काम करतात. याचबरोबर खाजगी प्रकाशने सुद्धा भरपूर आहेत. तेथे वेगवेगळ्या उत्तम उत्तम पुस्तकांचे अनुवाद केले जातात. याशिवाय भारतभरामध्ये अनेक राज्यांच्या राज्यभाषा आहेत, तेथे वेगवेगळ्या भाषांमध्ये दैनिकात येणाऱ्या जाहिराती, येणाऱ्या बातम्या, लेख यांचे सुद्धा भाषांतर अथवा अनुवाद करावा लागतो. बऱ्याच वेळेला दोन देशातील उद्योग जेव्हा आयात अथवा निर्यात होतात त्यावेळी त्या उद्योगातील लहान सहान गोष्टी किंवा एखादा कारखाना उभा करावयाचा असेल तर त्या कारखान्याचे विविध विभाग (पार्ट्स) यांची नावे याबद्दलही अनुवादकाचे काम करावे लागते. जगभरातील पर्यटक गोव्याला येतात.  तेथे फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये फ्रेंच, रशियन, इंग्रजी अशा भाषांमध्ये मेनू कार्ड ठेवावे लागते. तेथेही अनुवादक म्हणून काम करता येते. ऑनलाइन अनुवादकाचे काम संदीप नूलकर करतात. त्यांची 'Mind it', 'शब्दांशब्दांत' ही पुस्तके जर आपण जाणून घेतली तर अनुवादकाचे काम किती महत्त्वाचे हे लक्षात येईल. संदीप नूलकर लँग्वेज इंडस्ट्री एक्सपर्ट, स्क्रिप्ट रायटर, सब टायटल राईटर म्हणून प्रसिद्ध आहेत.

राष्ट्रीयकृत बँकांच्या परीक्षा अथवा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी भाषेचा पेपर असतो. तसेच काही वेळेला मराठी भाषेचाही पेपर असतो. या पेपरमधील प्रश्नांची तयारी करण्यासाठी मराठी भाषेचे व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असते. एमपीएससी व यूपीएससीला अनुक्रमे मराठी व इंग्रजी पेपर असतो. त्यात निबंधलेखन, कल्पनाविस्तार, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणे यासारखे प्रश्न असतात. 'पी हळद हो गोरी', 'अगं अगं म्हशी मला कुठे नेशी', 'हातच्या काकणाला आरशा कशाला?', 'आपलेच दात आपलेच ओठ'  यासारख्या म्हणींचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगता येत नाही हे आजचे वास्तव आहे. भाषा विषय कच्चे असल्यामुळे त्या अभ्यासपत्रिकेचे गुण कमी मिळतात व एकूण गुणांकन कमी आल्यामुळे त्या विद्यार्थ्याचे मेरीट कमी येते तसेच भाषिक कौशल्याची कमतरता असल्याने तो मुलाखतीला उत्तमपणे सामोरा जाऊ शकत नाही. अर्थात महाराष्ट्रातील  मराठी भाषिकांचे इंग्रजी कच्चे असते तसेच बारावीपर्यंतचे शालेय मराठी सुद्धा तितकेसे पक्के होत नाही;  याकरिता उत्तम शब्दसंग्रह असणे, चांगली वाक्यरचना करता येणे आणि भाषिक संकल्पना पक्क्या करणे महत्त्वाचे असते. व्यक्तिमत्त्व (Personality) आणि व्यक्तिमहत्त्व (Importance of Person) यातील फरक विद्यार्थ्यांना कळत नाही. तो समजला पाहिजे. हळूहळू भाषिक संकल्पना पक्क्या केल्या पाहिजेत. वृत्तपत्रात आणि प्रकाशन व्यवसायामध्ये सुद्धा यासाठीच मुद्रित शोधक हवे आहेत. त्यांना शब्दांची उत्तम जाण पाहिजे. त्यांचे शालेय व्याकरण पक्के असावयास हवे. तत्सम व तद्भव शब्दांची त्यांची ओळख असावयास हवी. हल्ली चांगले मुद्रितशोधक मिळत नाहीत. त्याचबरोबर मराठी लघुलेखक (Shothand writer) सुद्धा मिळत नाहीत. जिल्हा ते मंत्रालय स्तरावर विविध अधिकाऱ्यांकडे असे पद असते. अर्थात तेथे शुद्धलेखन व वाक्यरचना यांना महत्त्व आहेच. असा काही कोर्स आहे याची कल्पना मराठीच्या विद्यार्थ्यांना नसते. कार्पोरेट क्षेत्रातही आता अनुवादक, मुद्रित शोधक व लघुलेखकांना संधी आहे. त्या ठिकाणी पत्रव्यवहार करण्याकरिता भाषेची जाण असणाऱ्या व्यक्ती मिळत नाहीत. पत्राचा मसुदा तयार करता येत नाही. त्याचबरोबर शुभ संदेश देणे, जाहिरात तयार करणे, उत्तम लेख तयार करणे, वीणा वर्ल्ड  अथवा केसरी सारख्या ट्रॅव्हल कंपन्यांची लेखवजा जाहिरात करणे या गोष्टी सुद्धा कार्पोरेट क्षेत्रामध्ये होत असतात. हल्ली राजकारणातही उत्तम बोलणाऱ्या व्यक्तीस वक्ता म्हणून मागणी येत आहे. सध्या दिल्लीच्या निवडणुका होत आहेत;  अशा वेळी हिंदी भाषेवर मांड असणाऱ्या मुलामुलींना मागणी आहे. उमेदवारांची भाषणे लिहून देण्याचे काम अशा व्यक्ती करू शकतात. केंद्राच्या अनेक जाहिराती प्रथमत: इंग्रजीत किंवा हिंदीत असतात पण नंतर त्या त्या राज्यातील भाषेत अनुवादित केल्या जातात. दैनिकांमध्ये छापल्या जातात. या अनुवादाचे कामसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. वृत्तवाहिन्यावर बातमी देणे किंवा वाचणे अशा पद्धतीने दृकश्राव्य काम करताना आपणाला उत्तम भाषा अवगत असणे महत्त्वाचे आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर या पद्धतीने काम चालते. त्याचबरोबर तेथे विविध चॅनेलवर  नाट्यलेखन, कथा मालिका लेखन, पटकथा लेखन, गीत लेखन, कॉपीराईटर अथवा संहिता लेखन, जिंगल्स लेखन, पोस्टरची निर्मिती, प्रसिद्धीपत्रक लेखन, उद्घोषणा अशी विविध भाषाविषयक कामे करता येतात. याचबरोबर शासनाची जनसंपर्क कार्यालये असतात तेथे भाषा आणि पत्रकारिता असे अभ्यासक्रम केल्यास आपणाला उत्तम संधी मिळू शकते.

विविध भारतीय भाषा आणि परभाषेतील चित्रपट आणि मालिकांसाठी डबिंगचा मजकूर अथवा संवाद तयार करण्यासाठी सुद्धा उत्तम भाषा अभ्यासक लागतात. हे संवाद आपणास मराठीतून, हिंदीतून किंवा आपणास येणाऱ्या भाषेतून तयार करण्याची संधी असते. भारतामध्ये विशेषत: दक्षिण भारतातील तामीळ, तेलगू भाषेतील चित्रपट मराठी हिंदी व इतर भाषांमध्ये येताना अशा तऱ्हेचे डब अथवा अनुवादित संवाद तयार करता येतात. याचबरोबर चित्रपटांमध्ये संवादाबरोबरच चित्रपटाच्या पडद्यावर खालील बाजूला ज्या भाषेत चित्रपट डब केलेला आहे, त्या भाषेतील संवाद सबटायटल म्हणून दिले जातात. त्याचेही  लेखन शुद्धलेखनानुसार व शब्दांच्या योग्य क्रमानुसार करावे लागते. याचबरोबर आपणाला छोट्या मोठ्या गावांमध्ये पुस्तक विक्री केंद्र स्थापन करता येते. कारण आता  अनेक लोक लिहीत आहेत, वाचणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. घरोघरी जाऊन अथवा ऑनलाईन पद्धतीने आपण पुस्तकांची विक्री करू शकतो. अलीकडे मराठीमध्ये भयकथा, रहस्यकथा, कुटुंबकथा कमी कमी होत आहेत. अशा कथा लोकांना आवडतात. असे लेखन आपण करू शकतो. बालसाहित्यही लिहू शकतो.  पर्यावरण विषयक लेखनाला सुद्धा आता महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे असे लेखन करणे आणि  त्याचबरोबर असे लेखन  विविध समाज माध्यमावरती देणे शक्य आहे. युट्युब चॅनेल, ब्लॉग फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरती हे लेखन आपण देऊ शकतो. उत्तम ललित लेखक होणे सुद्धा महत्त्वाचे आहे. ललित लेखन करणे, नाटक-कादंबरी सारखे लेखन करणे आपणाला जमले तर पैसा आणि समाधान या दोन्ही गोष्टी मिळू शकतात. प्रकाशन व्यवसाय तर उत्तमच आहे. लोकप्रिय लेखकांची पुस्तके प्रकाशित करून आपण त्यातून आपला उदरनिर्वाह सहज करू शकतो.

न्यायालयात मराठीतूनही निकाल दिले जातात, त्यामुळे त्या ठिकाणी निकाल तयार करणे, टिप्पणी घेणे याशिवाय संगणकावर मजकूर टायपिंग करणे अशा तऱ्हेच्या कामासाठी मराठी भाषेचे अभ्यासक लागतात. अशी पदेही त्या ठिकाणी असतात. प्रशासनामध्ये सुद्धा विविध पदे असतात. विशेषतः भाषा संचालनालय, राज्याचे व प्रत्येक जिल्ह्याचे माहिती व जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी मराठीचा माणूस लागतो. महाराष्ट्र राज्याचे बालभारतीचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी संपादक, व्यवस्थापक या पदावर काम करता येते. महाराष्ट्र राज्याची अथवा महाराष्ट्र शासनाची लोकराज्य, शेतकरी अशी मराठी मासिक आहेत. त्यांच्यामध्ये लेखन करता येते, संपादन करता येते. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत चाललेला आहे. यामध्ये आपण मराठी भाषेचा अर्थातच वापर करू शकतो. त्या ठिकाणी खूप मोठ्या संधी आहेत. संगणकावरील विविध आज्ञा मराठीमध्ये आणता येतात. विविध मराठी संकेतस्थळे आणि ॲपची निर्मिती आपणाला करता येते. या आधारे आपण वेगवेगळी माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहचवू शकतो. त्याचप्रमाणे युट्युब आणि फेसबुकवर आपण महाराष्ट्रातील विविध प्रदेशाची, भाषेची, संस्कृतीची, परंपरांची माहिती देऊ शकतो. कोकण, मराठवाडा, वऱ्हाड, देश असे विविध प्रांत महाराष्ट्रामध्ये असल्याने तेथील प्रादेशिक व सांस्कृतिक माहिती आपणाला याद्वारे देता येते. स्वानंदी सरदेसाई हिचे युट्युब वरील मराठी बोलणे आणि तिने दिलेली माहिती ऐकल्यास, पाहिल्यास हे आपल्या लक्षात येईल. 

वाई येथील मराठी विश्वकोश मंडळामध्ये मराठी विश्वकोशातील विविध शब्द, त्यांचे अर्थ त्याचबरोबर त्या शब्दांच्या भोवती असणारे संदर्भ, कथा, गोष्टी यांचे संपादन केले जाते. त्या ठिकाणी जाणकार मराठी तरुण मुलांनाही सहाय्यक संपादक म्हणून भरती केले जाते. महाराष्ट्र शासनामार्फत ही पदे भरली जातात; तसेच ऑनलाईन विकिपीडियावर सुद्धा आपण मराठीतून लेखन करू शकतो. विकिपीडियातील अनेक नोंदी अपूर्ण आहेत, त्याच्यामध्ये आपण भर घालू शकतो. मात्र त्या नोंदी कशा करायच्या, त्या प्रामाणिकपणे कशा करायच्या याबद्दलचे प्रशिक्षण वर्ग आहेत अथवा याबद्दलची माहिती घ्यावी लागेल. मात्र एखाद्या गोष्टीबद्दल, घटनेबद्दल, शब्दाबद्दल अथवा व्यक्तिबद्दलची माहिती, शहराबद्दलची, प्रदेशाबद्दलची, पीकपाण्याबद्दलची, हवामानाबद्दलची माहिती आपण विकिपीडियावर भरू शकतो. जणू हा जागतिक माहितीकोश असतो तेथेही आपणाला आर्थिक कमाई होऊ शकते. 

हल्ली अनेक उत्तम प्रकाशक प्रकाशन संस्था मराठीसाठी संपादकाची, संपादनाची जागा ठेवत आहेत. उदाहरणार्थ तमीळ भाषेतील सलमा हिचे 'मध्यरात्रीनंतरचे तास' हे आत्मकथन कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ हिने अनुवादित केलेले आहे. त्याचे संपादन कविता महाजन यांनी केलेले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी संपादकाचे मानधन आपणाला मिळू शकते. सूत्रसंचालक आणि निवेदकांनाही हल्ली खूप मागणी आहे. आपल्या आजूबाजूला कार्यक्रमांची रेलचेल आहे. या ठिकाणी या लोकांना अत्यंत महत्त्व येते. याशिवाय वैचारिक निबंध, लेख, शोधनिबंध, नाटक कथा, भाषण, एकांकिका यांचे परीक्षक म्हणूनही आपणाला काम करता येते. यातून आपणास योग्य ते मानधन मिळू शकते.

भाषा येणाऱ्या व्यक्तीला अगदी अमेरिकेतही नोकरी करता येते. इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि चायनीज भाषा येत असेल तर अमेरिकेमध्ये नोकरीच्या अधिक संधी आहेत. जपानी भाषा येणाऱ्यांना जपानमध्ये अधिक संधी आहेत. अर्थातच भाषेची जाण असणाऱ्या व्यक्तींना आपण भेटले पाहिजे. भाषेमध्ये काय काय करता येईल यासाठी आपण या मोठ्या लोकांची मते जाणून घेतली पाहिजेत. अशोक सराफ, सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, संदीप नूलकर, सुरेश वांदिले याबरोबरच राज्य मराठी विकास संस्थेतील विविध सहकारी, राज्य मराठी भाषा विभागातील विविध अधिकारी यांना भेटून आपण कोणकोणत्या संधी आहेत हे जाणून घेतले तर मराठीसारख्या भाषेमध्ये अनेक संधी आहेत हे आपल्या लक्षात येईल. आपल्या महाविद्यालयातील भाषा विषयाच्या शिक्षकांना सुद्धा आपण सातत्याने भेटले पाहिजे.  अशा तऱ्हेचे अभ्यासक्रम देणाऱ्या अनेक संस्था आहेत. हे अभ्यासक्रम दीर्घकाळाचे नसतात तर तीन महिन्याचे, सहा महिन्याचे अथवा एक वर्षाचे असे अभ्यासक्रम विविध संस्थांमध्ये तसेच ऑनलाइन उपलब्ध आहेत. या सर्वांसाठी आपणाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो.

(महावीर महाविद्यालयात मंगळवार दि. २८ जानेवारी, २०२५ रोजी दिलेले व्याख्यान) 
          
                                      🪴