असंच काहीसं झालं ते काही वर्षापूर्वी लेह-लडाख-कारगिल येथे गेल्यावर ! पुण्याहून रात्री दहाची फ्लाईट रात्री पावणे बारा वाजता दिल्ली येथे पोचली, तेथून पहाटे पाचची फ्लाईट लेहला सकाळी साडेसहाला उतरली. हिमाचल प्रदेशाच्या पुढे बर्फाच्छादित पर्वतांच्या रांगा, ढगांचे भलेमोठे पुंजके दिसू लागले. पहाटे पाचवीसलाच सूर्योदय आणि कडक ऊन होते. जुलैचा शेवटचा आठवडा होता. लेहचे विमानतळ लष्करी असून छोटे आहे. नवीन विमानतळाचे बांधकाम चालू आहे. तेथे आणखी एक इमर्जन्सी मिलिटरी एअरपोर्ट आहे. लडाख-लेह-कारगिल अशी हिमालयाची पूर्वपश्चिम पर्वतरांग पसरली आहे. लडाख हा भारतातील सर्वात उंच भाग आहे. लेह गाव अकरा हजार फूट उंचीवर आहे. तो जिल्हा असून या शहराची लोकसंख्या दीड लाख आहे. तेथे बौद्धधर्मिय बहुसंख्य आहेत. कारगिलमध्ये पाकिस्तानची सीमा लागते. एप्रिल ते सप्टेंबर पर्यटन चालते. बाकी बर्फच असतो. ऑक्टोबरच्या काळात बर्फ असतानादेखील बरेच परदेशी पर्यटक येतात. पहिला दिवस विमान प्रवासाचा हँगओव्हर मुळे झोपण्यातच गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही नुब्रा व्हॅलीकडे गेलो. जाताना खारदुंगला पास लागतो. पास म्हणजे एक घाट चढून परत उतरताना मध्यावर लागणारी उंच जागा होय. हा पास १७९८२ फूट उंचीवर लेह मध्ये आहे. तेथे सियाचीन बेस कॅम्प असून त्यास गेट वे ऑफ सियाचीन असे म्हटले जाते. उंचीवर अर्थातच एसीसारखी थंड हवा असते. पावसाचे शिंतोडेही उडाले. Karakoram पर्वताची रांग आणि सभोवतालचे बर्फ सारे दृश्य पाहण्यासारखे होते. प्रचंड डोंगरदऱ्या बाकी काही नाही. एक अद्भुत अनुभव ! संध्याकाळपर्यंत नुब्रा व्हॅली काही संपता संपेना. त्या व्हॅलीतच लांबपर्यंत वस्ती होती. ५०-६० किलोमीटर पसरलेली. पूर्ण प्रवास १२५ किलोमीटरचा होता. तिबेटियन शब्द डुमराचे नुब्रा झाले आहे. हा जणू त्रिभुज प्रदेश आहे. डुमरा म्हणजे फुलांची दरी. रात्री Hunder village मध्ये वस्ती केली. दुसऱ्या दिवशी आम्ही भारत-पाकिस्तान सीमेवर गेलो. Turtuk, Tayshi व नंतर Thang हे गाव शेवटी लागते. तेथून सीमेवरील काटेरी कुंपण दिसते. पाकिस्तानातील गाव व झेंडा दिसतो. हा सारा रस्ता Shyok या खळाळत्या नदीच्या काठाने जातो. हा सारा परिसर लेह जिल्ह्यातील नुब्रा तालुक्यात येतो. १९७१ च्या युद्धानंतर या Indo-pak बॉर्डरवरील चार गावे भारतात आली. त्या प्रदेशास Gilgit Baltistan असेही म्हणतात. पुढे अफगाणिस्तान व चीन यांच्या सीमा लागतात. Turtuk, Thang गावात बाल्टी वंशाची कुटुंबे राहतात. इसवी सन २०११ मध्ये तेथे फक्त १६ कुटुंबे होती.
तिसऱ्या दिवशी Pangong Lake पाहण्यासाठी चाललो. जाताना Sakti village लागले. अगोदर वारीला पास लागतो. हा १७४२७ फूट उंच आहे. पूर्व लडाख व पश्चिम तिबेटमध्ये पसरलेला खाऱ्या पाण्याचा हा तलाव ! १३४ किलोमीटर लांब आहे. तो १३८६८ फूट उंचीवर आहे. ५०% चीनमध्ये ४०% तिबेटमध्ये व दहा टक्के भारतात असा हा तलाव, खूपच सौंदर्यपूर्ण..! आजूबाजूला फक्त डोंगर रांगा व आकाशाची पोकळी...! रंग बदलणारे पाणी...! हिवाळ्यात हे सरोवर पूर्णपणे गोठते. या सरोवराच्या काठी राहण्यासाठी असलेले कॉटेज अतिशय सुंदर आहेत. परत येताना आम्ही Changala Pass (Top) येथे थांबलो. तो १७६८८ फूट उंच आहे. हवेहवेसे थंडगार वारे, शुद्ध स्वच्छ हवा...! पाय हलत नाही...! तिथून परत येताना खूर (khur) या गावात दुपारचे जेवण केले. तेथेच मी दोन सुंदर रोपटी घेतली, आता ती कोल्हापुरात आहेत. येथे NH 3 चा रस्ता लागतो.
पुढच्या दिवशी NH 1 या रस्त्याने आम्ही कारगिल येथे चाललो. हा रस्ता पुढे श्रीनगरकडे जातो. हा जिल्हा असून लोकसंख्या दीड लाख आहे. अर्थातच वाटेत Namikala pass १२१९८ फूट आणि Fotula pass १३४७९ फूट उंचीवर लागतात. सिंधू नदीवरील घाट (Indus river ही नदी तिबेटमध्ये उगम पावलेली आहे.), Thiksey Monastry (दोन्ही लेहपासून २२ किलोमीटर अंतरावर आहेत.) आणि Maitreya Statue पाहिला. Rancho School जेथे आमीर खानच्या थ्री इडियटचे शूटींग झाले होते, ते पाहण्यासारखे आहे. World's Hights Rafting Point हा Indus आणि Zanskar या नद्यांच्या संगमावर आहे. हा नद्यांचा संगम Nemo या गावात आहे. येथे तीन टप्प्यात राफ्टींग करता येते. संथ, गतिमान आणि खूपच खळाळत्या पाण्यावर...! लेहपासून कारगिल २०८ किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत काही Stupa तसेच दगडात कोरलेली क्राफ्टिंग बुद्धाची मूर्ती पाहिली. Indus नदीच्या कडेनेच कारगिलकडे रस्ता जातो. वाटेत Lamayuru gonpa moon land लागते. जणू चंद्रावरील भूमीसारखा हा प्रदेश दिसतो. कारगिलमधील Suru नदी काठावरील TFC ची गार्डन खूप छान आहे. कारगिलच्या अलीकडे ५५ किलोमीटरवर Dras येथे कारगिल वॉर मेमोरियल आहे. छत्रपती संभाजीनगरचे फौजी गणेश भुतेकर यांनी आम्हाला या युद्धाबद्दलची माहिती दिली. या स्मारकात आपली व शत्रूची शस्त्रे, फोटो, बातम्या माहितीसह लावलेले आहेत. हॉलमध्ये ७०-८० पर्यटक होते. तेथेच मला कॅप्टन विजयवंत थापर यांचे आई-वडिलांना पाठवलेले शेवटचे पत्र मोठ्या आवाजात वाचण्याची संधी मिळाली. खरं तर कंठ दाटून आला होता. २८ जून १९९९ रोजी विजयवंत शहीद झाले. त्यावेळी ते केवळ २२ वर्षांचे होते. त्यांचे घरगुती नाव रॉबिन होते. ते पत्र....
प्रिय पापा, मामा, बर्डी और ग्रेनी,
1. जिस समय आपको यह पत्र मिलेगा, उस समय तक मैं स्वर्ग में अप्सराओं के बीच से आप सब को देख रहा होऊंगा.
2. मुझे ज़िंदगी में कोई खेद नहीं है, अगर फिर से इनसान के रूप में मेरा जन्म हुआ, तो मैं फौज में भर्ती होकर अपने देश की सेवा करूंगा.
3. अगर आप लोग आ सकते हैं, तो कृपया आकर उस जगह को ज़रूर देखिए, जहां भारतीय सेना ने आपके आने वाले कल के लिए लड़ाई लड़ी थी.
4. जहां तक हमारी यूनिट का सवाल है, तो नए जवानों को इस बलिदान के बारे में ज़रूर बताया जाना चाहिए. मुझे आशा है कि मेरी तस्वीर ‘ए’ कॉय मंदिर में करणी माता के साथ रखी जाएगी.
5. हमारे शरीर से अंगदान के तौर पर जो भी अंग लिया जा सकता है, उसे ज़रूर लिया जाए.
6. कृपया कुछ पैसे अनाथ आश्रम को दे देजिएगा और हर महीना पचास रुपया रुखसाना को देते रहिएगा और योगी बाबा से भी ज़रूर मिलिएगा
7. बर्डी को मेरी शुभकामनाएं, कृपया इन लोगों के बलिदान को कभी मत भूलिएगा. पापा, आपको गर्व होना चाहिए और मम्मा आपको भी. कृपया…से (निजता की वजह से नाम हटा दिया गया है) मिलते रहिएगा (मैं उससे प्यार करता हूं). मामाजी मेरी भूल-चूक को माफ कर देना.
ठीक है फिर, अब मेरा डर्टी डजन की टुकड़ी के साथ जाने का वक्त हो गया है. मेरे हमलावर दस्ते में बारह जवान हैं. आप सभी को मेरी शुभकामनाएं.
लिव लाइफ, किंग साइज़
आपका
रॉबिन
(हे करणी माता मंदिर राजस्थानमध्ये आहे तेथे असंख्य उंदीर सर्वत्र फिरत असतात. रुकसाना छह साल की बच्ची थी और जम्मू-कश्मीर के कुपवाड़ा में रहती थी. रुकसाना के पिता की आतंकवादियों ने उसी के सामने हत्या कर दी थी. इस हादसे से रुकसाना की बोलने की क्षमता चली गई थी. जिस समय रुकसाना के पिता की हत्या हुई थी कैप्टन विजयंत थापर उसी जिले में तैनात थे. जब उन्होंने रुकसाना के साथ हुए हादसे के बारे में सुना तो वे उससे मिलने उसके स्कूल जाने लगे.) परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बात्राची गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे. त्याचे 'दिल माँगे मोअर' हे उद्गार आणि त्याच्यावरील 'शेरशाह' हा चित्रपट..! येताना लेहमधील 'हॉल ऑफ फेम' हा कारगिलवरील लेसर शो पाहिला.
शेवटी लेहमधील शांतिस्तूप पाहून परतलो. येथील शांतिस्तूप ११८४१ फूट उंचीवर आहे. तो २५ ऑगस्ट, १९८५ ला बांधलेला आहे. विविध आकारातील हे स्तूप बुद्धांच्या संदेशाचे व मनाचे प्रतीक आहेत. कारगिल मार्गावरच गुरुद्वारा श्री पत्थर साहिब आहेत. गुरुनानक देव यांनी आपल्या यात्रेदरम्यान सन १५१७ मध्ये तेथे मुक्काम केला होता. त्याची एक मोठीच कहाणी आहे. त्याच्याच पुढे Magical Magnetic Hill लागते. तेथे गुरुत्वाकर्षणामुळे रस्त्यावर गाडी लावल्यास परत मागे फिरते. १९९९ मध्ये पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर कारगिल येथे आपले जवान आता हिवाळ्यात सुद्धा उणे ४०°c अशा थंड हवेतही पहारा देत असतात. Vijayak Project आणि BRO या पर्वतरांगातून रस्ते बनवत आहे पण हिमालय पर्वत ठिसूळ असल्याने जागोजागी land sliding होते; तर कधी कधी ढगफुटीमुळे रस्ताच वाहून जातो. आमची गाडी अशाच एका रस्त्यावर अडकली. आम्ही सगळे खाली उतरलो तर बर्फाहून थंड पाण्याने पायातले बळच गेले. हा अतिशय थरारक अनुभव होता. जुलैमध्ये लेहला १२, नुब्राला ७, पेनगॉगला ७ तर कारगिल येथे ११ असे तापमान असते. हिमालयाच्या पर्वतरांगामुळे खरे तर पावसाळी ढगांना अटकाव होऊन ढगांची फक्त सावलीत पडत राहते, पाऊस जवळजवळ नसतोच, त्यामुळे पुढे होणाऱ्या हिमवर्षावातूनच पाणी मिळते. झाडे, घनदाट जंगल असे काहीच नाही. केवळ उघडे-बोडके डोंगर दिसतात. मात्र काही ठिकाणी उंच poplar, willo ही झाडे दिसतात. willo या झाडापासून बॅट बनवली जाते. Himalayan Mormat (खार), Dong Yak, अस्वले, काळवीट, Ibex ही काळवीटासारखी दिसणारी दणकट मेेंढी, सुुवर्ण गरुड असे पक्षी-प्राणी तेथे आहेत. तेथील apricot (जर्दाळू) प्रसिद्ध आहे. लडाखी भाषेत Julley म्हणजे वेलकम, थँक्यू, नमस्ते हा अर्थ आहे.
सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निमित्ताने समाजमाध्यमांवर त्यांची बाजू मांडणारा व त्यांना बदनाम करणारे असे दोन गट तयार झालेले दिसतात. गमतीचा भाग म्हणजे यातील बहुतेकांना सोनम वांगचुक किंवा लदाख याबद्दल सगळी ऐकीवच माहिती आहे, स्वानुभव काहीच नाही.
सोनम वांगचुक हा तिथला खराखुरा पर्यावरणवादी, उत्कृष्ट संशोधक व महात्मा गांधींच्या खरी तालीम या तत्त्वावर शैक्षणिक प्रयोग करणारा एक अवलिया. बोले तैसा चाले याचं परिपूर्ण उदाहरण. याचे पर्यावरण आणि जागृतीविषयक व शैक्षणिक म्हणता येतील असे व स्वतःचे अनुभव शेअर करणारा, तेव्हा सोलर वॉटर हीटरवर बरीच चर्चा सुरू होती त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची इतर भागातली गणितं इथे लावू नका. लदाखमधली माणसं दहा-दहा दिवस आंघोळी करत नाहीत, गरजच पडत नाही त्यांना. पाण्याची प्रचंड कमतरता आहे आणि बरेच लदाखी दिवसाला पाच लिटर इतक्या कमी पाण्यात राहू शकतात. सोनम वांगचुक हा अतिशय सजग आहे. कमीत कमी ऊर्जा वापर कमीत कमी रिसोर्सेस वापरणे हे तो स्वतः पाहतो, वागतो. कैराट या कारगिल भागातील एका गावाजवळ त्यांनी निवडलेल्या जमिनीवर आतापर्यंत चारहजार झाडं त्यांनी लावली आहेत, युवा कैराट नावाचा एक ग्रुप या झाडांची काळजी घेतो. लल्लनटॉप च्या एका मुलाखतीत त्यांनी थ्री इडियट मधील फुंनसुक वांगडू ही भूमिका त्याच्यावरील आहे, हे सांगितले. सोनम भाषाप्रेमी आहे आणि जवळजवळ आठनऊ भाषांवर त्याचं प्रभुत्व आहे. गाणीही छान गातो.त्याचं वागणं बोलणं बहुतेक सगळं ग्रासरूट इनोवेशन्स, पर्यावरण व शैक्षणिक सुधारणा याच्याशी निगडित असतं.
अर्थात जे लिहिले ते खूपच रुक्ष आहे. लेह-लडाख-कारगिल प्रत्यक्ष पाहणे हा अनुभवच खूप थरारक असेल. माझ्यासोबत कराडचे (जि. सातारा) राजेंद्र थोरात आणि त्यांची पत्नी ज्योत्स्ना थोरात हे दोघे होते. त्याचबरोबर रिद्धेश होता. मानस ऊर्फ मन्या सुर्वे आणि मल्हार ऊर्फ चुलबुल पांडे पुण्याची ही दोन मुलेही सोबत होती. परत येताना दुपारी एक वाजता लेह ते दिल्ली विमानातून बर्फ पांघरलेल्या या पर्वतरांगा वरुन ढगांतून बघताना अतिशय रम्य वाटते. लेह ते दिल्ली व दिल्ली ते पुणे या विमान प्रवासात खिडकीजवळ (window seat असे इंग्रजीत म्हणतात. 😂) बसलो होतो, त्यामुळे आकाशातून जमिनीवरील दिसणारे दृश्य अतिशय मनमोहक होते.
🌿🌿🌿