Sunday, April 17, 2022

सीमाभागातील कवी : कृ. ब. निकुंब : बी ए भाग ३


कृष्ण बलवंत निकुंब 

यांचे शालेय शिक्षण सरकारी हायस्कूल, नाशिक येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालय नाशिक येथे झाले. मुंबई विद्यापीठातून ते एम.ए.ची परीक्षा प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कर्नाटक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आणि लिंगराज महाविद्यालय, बेळगाव येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. तसेच कर्नाटक विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर केंद्रात निवृत्त मानसेवी प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

‘ऊर्मिला’ (१९४४), ‘उज्ज्वला’ (१९४५), ‘अनुबन्ध’ (१९६५), ‘अभ्र’ (१९७५) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘पत्रं पुष्पम्’ हे मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ‘फणसाचं पान’ या गोविंदाग्रजांच्या निवडक कवितांचे, आणि ‘साहित्य पराग’ हे अर्वाचीन मराठी कवितांचे संकलन व संपादन त्यांनी केले आहे. ‘साहित्यसमीक्षा’ हे समीक्षालेखन त्यांनी केलेले आहे. ‘पारख’ या समीक्षात्मक ग्रंथात त्यांनी संत नामदेव, संत तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, बी, इत्यादी कवींच्या काव्याचे मूल्यमापन केले आहे. हा ग्रंथ १९७३ साली प्रसिद्ध झाला आहे. ‘पावसाचं घर’ आणि ‘सायसाखर’ (१९५४) हे त्यांचे बालगीतसंग्रह असून ‘मृगावर्त’ (१९७०) या खंडकाव्याचे लेखनही त्यांनी केले आहे.

कृ.ब.निकुम्ब यांना साहित्याबरोबरच चित्रकला, आणि संगीत ह्या कलामध्ये रुची होती. केशवसुतांपासून बदललेल्या मराठी कवितेच्या परंपरेत निकुम्बांची कविता अवतरली. भावगीत रचनेचे, काव्यरचनेचे विविध प्रकार कणिका, सुनीते, गझल या सार्‍यांचा समावेश त्यांच्या रचनांमध्ये होता. अपुर्‍या आकांक्षा आणि भग्न ध्येये हे त्यांच्या कवितेचे विषय झाले. सौम्य आणि शांत प्रकृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य होते. जीवनात जे-जे उदात्त आणि कोमल आहे त्याचे वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून केले. निसर्गाची अनेक भावमधुर रूपे त्यांच्या कवितेतून साकारली. तसेच मानवी भाव-भावनांचा तरल आविष्कार त्यांच्या कवितेतून झाला. उत्तरोत्तर त्यांची कविता अधिकाधिक सूक्ष्म चिंतनशील होत गेली. तसेच वैयक्तिक अनुभूतींचे कलात्मक आविष्करण त्यांच्या कवितेतून होत गेले.

‘घाल घाल पिंगा वार्‍या’ हे त्यांचे गीत अजूनही आवडीने ऐकले जाते. लोकान्तापेक्षा एकान्तात रमणारा काव्यप्रेमी, स्वप्नाळू, सौंदर्यासक्त कवी म्हणून निकुम्ब ओळखले जातात. अनेक संतकवींच्या, आधुनिक कवींच्या काव्याची आस्वादक समीक्षा करून त्यांनी या काव्यांचे मोठेपण रसिकांना जाणवून दिले आहे.

‘अंतःकरणातील भावना काव्यरूपात प्रकट होणे, म्हणजे उंबराला फूल येणे’ अशी त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्या काव्यविषयक दृष्टीकोनाचा प्रत्यय आणून देते.

ज्योत्स्ना कोल्हटकर

सीमाभागातील कवी : इंदिरा संत : बी ए भाग ३

इंदिरा नारायण संत 

या पूर्वाश्रमीच्या इंदिरा गोपाळराव दीक्षित. विजापूर जिल्ह्यातील ‘इंडी’ या तालुक्याच्या गावी दीक्षितांच्या कुळात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गोपाळ सीताराम दीक्षित हे प्रशासकीय सेवेत मामलेदार होते. वडिलांची गावोगावी बदली झाल्याने कानडी मुळाक्षरे व थोडेसे लेखन-वाचन त्यांनी घरीच केले. ‘तवंदी’ हे त्यांच्या वडिलांचे मूळ गाव होते. घरच्या वाङ्मयीन वातावरणामुळे इंदिराबाईंच्या मनात कविता लेखनाची आवड बालपणातच निर्माण झाली. घरी ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांसारखे ग्रंथ; भारतगौरव ग्रंथमालेच्या कादंबर्‍या; मनोरंजन, उद्यान इत्यादी मासिकांचे अंक यांसारखे खूप साहित्य होते. या वाचनाने या पुस्तकांतून भेटणार्‍या लालित्याचा, भावात्मकतेचा खोल ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटला आणि याचा परिणाम म्हणजे त्यांना कविता लेखनाचा छंद जडला. त्यांच्या घरचे सात्त्विक संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्याकरिता उपयोगी पडले.

घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी स्तोत्रे म्हणण्याची पद्धत होती त्यामुळे काव्य छंदात्मक असते याची त्यांना जाणीव झाली. घरी पोथ्या-पुराणे, संतवाङ्मय तसेच मोरोपंत, वामन पंडित, यांचे आख्यानकाव्य यांचे वाचन होत असल्याने प्राचीन मराठी कवितेचा संस्कार बालपणीच यांच्या मनावर झाला. तसेच त्यांची आई त्यांच्याकडून भूपाळ्या व तुळशीपूजा म्हणवून घेत असे. अशा प्रकारे आई-वडिलांचे, घराण्याचे सुसंस्कार लहान वयातच झाल्यामुळे त्यांची काव्याविषयीची गोडी अधिकच वाढली. या संस्काराचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या काव्यावरही झाला. ‘बाहुल्या’ (१९७२) या संग्रहातील ‘सोन्याची कोयरी’ या कवितेत त्यांनी या सुसंस्कारांची जाणीव व्यक्तही केली. त्या सहा-सात वर्षांच्या असतानाच १९२० साली गदग येथे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना ‘तवंदी’ येथे काकांकडेच राहावे लागले.

इंदिरा संतांचे बालपण ‘तवंदी’ या खेड्यात गेल्यामुळे या खेड्यातील निसर्गदृश्ये त्यांच्या अंतःकरणात ठसली . निसर्ग-सौंदर्याचा खरा आस्वाद इंदिराबाईंनी बालवयातच घेतला. त्यामुळे त्यांच्या बालपणीच्या अनुभवांना विशेष महत्त्व आहे. बालपणापासून स्पर्श, रस, रंग, गंध, रूप आणि वृत्ती इत्यादी संवेदना अनुभवांचे रसपान करीतच त्यांच्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

इंदिराबाईंना लहानपणापासूनच मातीची ओढही आहे. त्या एकाच वेळेस निसर्गकन्या व भूमिकन्या आहेत. ‘मृण्मयी’ या कवितेतूनच त्यांची ही ओढ व्यक्त होते. सारा निसर्ग त्या विद्युत्कणाने असा काही जवळ केला की कवितेतील पहाड, तिरपा पाऊस, ते हिरवेपण, ते आभाळ या सर्वांना त्या प्राणानेच जीवकळा लाभली. तो निसर्ग जणू एखाद्या सतारीसारखाच त्यांच्या मनात उभा राहिला आणि त्यावर भाववृत्ती झंकारल्या. या निसर्गाचा परिणाम त्यांच्या बाह्य व अंतर्गत व्यक्तिमत्त्वावर अतिशय खोलवर गेलेले आहे.

इंदिराबाईंना बा लपणापासूनच ओव्यांचे आकर्षण होते. ओव्या गोळा करण्याचा छंद होता. या स्त्री-गीतांचा परिणाम असल्यामुळे वृत्त, जाती, राग यांचा स्वीकार न करता, ओव्यांमधील नादलय व स्वरलय आवडल्यामुळे त्या ओवी वृत्तातच कविता लिहीत. ओवी म्हणजे त्यांना उत्कृष्ट भावकविता वाटायची. शब्दांचा साधेपणा, वृत्तीचा बाळबोध नितळपणा व मोठा आशय थोडक्यात सांगण्याची शक्ती हे सारे ओवीतले गुण त्यांच्या कवितांत रुजले. एकूणच बेळगाव व तवंदी या दोन्ही गावांच्या अनुभवांनी त्यांची कविता समृद्ध झाली. शालेय शिक्षणातच त्यांच्या कविता प्रेमाला खतपाणी मिळाले. इंदिराबाईंचे दहावीपर्यंतचे शिक्षण बेळगावलाच झाले. त्यांनी वि.स.खांडेकर, ना.सी.फडके यांच्या कादंबर्‍या; बालकवींची कविता, इंग्रजी पुस्तके हे सारे शालेय जीवनातच वाचले. एकाकीपणाची जाणीवही याच काळात झाली. ‘सहवास’ या पहिल्या संग्रहातली ‘अनाथ’ ही कविता याचे दर्शन घडवते. मनातील भाव कवितेत उतरवावेत ही जाणीव त्यांना या कवितेपासून झाली. पण घरातल्या कडक शिस्तीत कवितेचे अंकुर जळून गेले. एकीकडे कटू वास्तवता व दुसर्‍या बाजूला कवितेतील स्वप्नसृष्टी! त्यामुळे त्यांच्या स्वभावाची घडण गांभीर्याकडे झुकली. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात झाले. याच वेळी मित्र-मैत्रिणींच्या सहवासात कवितेची आवड पुन्हा निर्माण झाली. याच काळात महाविद्यालयामधले प्रसिद्ध लघुनिबंधकार नारायण माधव संत यांच्याशी इंदिराबाईंचा परिचय झाला. समानशीलत्वामुळे त्या परिचयाचे रूपांतर प्रीतीत झाले. जीवनातील खर्‍या काव्याची ओळख झाली. दोन्हीकडच्या विरोधी परिस्थितीतही १९३५ साली जूनमध्ये इंदिराबाई व संत विवाहबद्ध झाले. स्वप्न साकार झाल्याचे समाधान त्यांना वयाच्या २१व्या वर्षी मिळाले. लग्नानंतर त्यांच्या सुखी संसाराचे, संतृप्त वृत्तीचे चित्रण त्यांच्या काव्यातूनही जाणवते.

संसार, मुले, मधूनमधून नोकरी यांत रममाण होताना त्यांचे  कवितेकडे लक्ष नव्हते. १९३६पासून म्हणजे लग्नानंतर इंदिराबाईंनी पुणे, बेळगाव, मुंबई या ठिकाणी नोकरीनिमित्त वास्तव्य केले. सुखी संसाराच्या या दशकानंतर त्यांचे दुःखपर्व सुरू झाले. १९४६ साली, ना.मा.संतांच्या मृत्यूनंतर इंदिराबाई दुःखात पार बुडाल्या. या दुःखाचे चित्रण त्यांनी अनेक कवितांतून उत्कटपणे केले. ‘कातरवेळेला’ या कवितेतून हे दुःख विशेषतः व्यक्त झाले आहे. सफल प्रीतीपेक्षा जीवघेण्या दुःखाचे चित्रण त्यांच्या काव्यातून प्रतिबिंबित झाले.

मराठी काव्याच्या इतिहासात इंदिरा संत ह्या ‘विशुद्ध भावकविता लिहिणार्‍या कवयित्री’ म्हणून विख्यात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या आधुनिक मराठी कवितेच्या युगाचे प्रणेते मर्ढेकर हे सर्वश्रुत आहेत. मागच्या कवितेचा ठसा पुसून टाकून त्यांनी नवीन वाट तयार केली. इंदिरा संतांनी ही वाट पूर्णतः स्वीकारली नसली, तरी मर्ढेकरांच्या नवकाव्याचे, प्रतिमांचे संस्कार त्यांच्या कवितेवर होत गेले. समकालीन कवयित्री पद्मा गोळे, संजीवनी मराठे, सरिता पदकी यांच्यापेक्षा इंदिराबाईंची कविता निराळी आहे. जात्यावरच्या ओव्या, लोकगीते आणि मर्ढेकरी काव्याचा नवीन प्रवाह या त्रयींनी इंदिरा संतांचे काव्य वेगळे झाले. इंदिराबाईंचे काव्य निसर्गावर आहे. तो त्यांच्या कवितेत पूर्णपणे भिनला आहे. सुखासीन पातळीवरून इंदिराबाईंच्या आयुष्यातून प्रा.संत निघून गेल्यामुळे त्यांची झालेली मानसिक व शारीरिक फरफट हे सर्वार्थानेच अचानक झालेले. त्यांच्या जीवनातील हे परिवर्तन काव्यवळणाच्या वाटा बदलवण्यासाठी कारणीभूत झाले.

‘सहवास’ (१९४१), ‘शेला’ (१९५१), ‘मेंदी’ (१९५५), ‘मृगजळ’ (१९५७), ‘रंगबावरी’ (१९६४), ‘बाहुल्या’ (१९७२) ‘मृण्मयी’ (संपादित रमेश तेंडुलकर), ‘गर्भरेशीम’ (१९८२), ‘चित्कळा’ (१९८९), ‘वंशकुसुम’ (१९९४), ‘निराकार’ (२०००) असा त्यांचा काव्यप्रवास आहे.

१९४१ साली निघालेला ‘सहवास’ हा एकच संग्रह; सफल प्रीतीच्या नंतर ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’ हे दुसरे वळण आणि ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’, ‘चित्कळा’, ‘वंशकुसुम’ आणि ‘निराकार’ हे तिसरे! या शेवटच्या संग्रहातून त्यांचे चिंतनपर वर्तुळ पूर्ण होते या काव्यप्रवासात प्रतिमांना आणि रंगांना विशेष स्थान आहे. इंदिराबाईंच्या कवितेतील आत्मनिष्ठाच आशय-अभिव्यक्तीचे एकरूप दर्शवते. सारे प्रतिमाविश्व निसर्गरूपातून आले आहे. चिकाच्या पडद्याआडून जितके दिसते, तितके पण आपल्या प्रतिमांचे सुबक दर्शन तर व्हावे अशा प्रतिमांचा वापर इंदिराबाई कुशलतेने करतात. तसेच ‘माती’ हे त्यांचे आवडते प्रतीक असून ‘राधा’ व ‘मोर’ हे त्यांचे आवडते घटक आहेत.  दृश्य, स्वाद, नाद यांच्या एकात्मतेचा अनुभव यांच्या प्रतिमा देतात.

लाल, जांभळा, निळा, काळा अशा रंगप्रतिमा हे यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. तर टिंबे, उद्गारवाचक चिन्हे, अपसारण चिन्हे व रिकाम्या जागा यांनाही इंदिराबाईंच्या कवितेत विशेष प्राधान्य आहे. शब्दप्रतिमा योजून इंदिराबाई त्यांच्या कवितेला बांध घालतात आणि त्या अनुभवाला मूर्त करतात. शाश्वत व सनातन असलेल्या सृष्टीतील प्रतिमांचा वापर त्या करतात आणि आशय-अभिव्यक्तीचा एक सुरम्य आविष्कार त्यांच्या कवितेतून सादर होतो.

कवितेव्यतिरिक्त इंदिराबाईंचे ‘शामली’ (१९५२), ‘कदली’ (१९५५) व ‘चैतू’ (१९५७) असे तीन कथासंग्रह, ‘मृद्गंध’ आणि ‘फुलवेल’ ही आत्मकथनपर ललितबंधांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘गर्भरेशीम’ या काव्यसंग्रहाला तसेच 'घुंघुरवाळा' या लोकसाहित्यावरील संपादित पुस्तकासाठी  साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९९५ मधल्या  जनस्थान पुरस्काराच्या (नाशिक १९९५) त्या मानकरी ठरल्या.

१९७८ मध्ये कर्‍हाड येथे महाराष्ट्र राज्य कवयित्री संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. वयाच्या ८६व्या वर्षी बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.

डॉ. सुलभा हेर्लेकर

आपल्या जवळचे लेखक : बी ए भाग ३



रणजित रामचंद्र देसाई : (जन्म : ८ एप्रिल १९२८; - ६ मार्च १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमानयोगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित 'नाच गं घुमा' हे आत्मचरित्र अतिशय गाजले. स्वामी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार १९७३ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. 

शिवाजी गोविंदराव सावंत : (३१ ऑगस्ट,१९४० ते १८ सप्टेंबर, ००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. शिवाजी सावंत यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील 
आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.

पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.

मृत्युंजय(१९६७), या पौराणिक कादंबरीच्या प्रस्तावनेत शिवाजी सावंत यांनी हिंदीतील केदारनाथ मिश्र ह्यांचे कर्ण आणि रामधारी सिंह ‘दिनकर’ ह्यांचे रश्मिरथी ह्या दोन खंडकाव्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे.

मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.

’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. शिवाजी सावंत यांची कादंबऱ्यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे.

मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगांतर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कऱ्हाड येथे भरणाऱ्या ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.