अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वारकरी पंथ टिकून राहिला, वाढत राहिला आणि आजही तो आपल्याला पूर्वीइतकाच जोमदार दिसतो याचं आणखी एक कारण म्हणजे या पंथानं सुरुवातीपासून आपलं आविष्काराचं साधन मौखिक ठेवलं आहे. छापण्याची कला नव्हती तेव्हा हा पंथ सगळीकडे पसरला. तुकारामांचे अभंग ऐकल्यावर ब्रिटिश इतिहासकार ग्रँट सारख्या लोकांना आश्चर्य वाटले की एवढे हे अभंग खेडोपाडी म्हटले जातात पण त्याचं पुस्तक कसं नाही. मौखिक गोष्टी एकप्रकारे सुरक्षित असतात. एकदा तुम्ही पाठ केलं की स्मृतीत ते राहतं. तुकारामाच्या वह्या बुडवल्या पण मौखिक जे होतं ते कुणाला बुडवता आलं नाही.
आजही प्रिटिंग आणि इलेक्ट्रॉनिकच्या जमान्यात हा मौखिकतेचा मुद्दा लागू आहे.वारकरी संप्रदायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा अतिशय लोकशाहीवादी आणि विकेंद्रीकरणावर भर देणारा पंथ आहे. एकच एक केंद्र आहे असं या पंथात नाही. म्हणजे पंढरपूर या पंथात महत्त्वाचं असलं तरी देहू, आळंदी, पैठण या ठिकाणी गेलं तरी चालतं आणि त्यांनाही महत्त्व आहे. पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं काही नाही. अगदी तुकारामही पंढरपूरला गेला नव्हता असे म्हणतात. तिथेच जाऊन काही केलं पाहिजे असं काही नाही.
तुम्ही इंद्रायणीत आंघोळ करा नाही तर तुमच्या गावाच्या नदीत आंघोळ करा, गोदावरीत करा, तापीत करा तरी चालेल. ज्याला जसं शक्य आहे तसं करण्याची मुभा आहे. आणखी एक म्हणजे चालत जाणं यामध्ये एक सर्जनशीलता आहे. आपल्या शहरी माणसाला पायी चालण्यातला सर्जनशीलपणा कळणार नाही. पण आपण चालताना जे दिसतं, जे अनुभवतो, माणसांना जोडलो जातो ते अतिशय क्रिएटिव्ह असतं. ही एक आधुनिक कृती आहे.
वारकरी संप्रदायाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य आणि बरोबरीचा दर्जा. मोठ्या प्रमाणात या पंथात स्त्रिया संत झालेल्या आहेत. रोमन कॅथलिक पंथात आता आतापर्यंत स्त्रियांना धर्मगुरू होता येत नव्हतं. त्या तुलनेत वारकरी पंथात अगदी जनाबाईपासून ते बहिणाबाईपर्यंत महिला संतांची परंपरा आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बारा महिने सतत शेतात राबावं लागणाऱ्या स्त्रियांना दिंडीमुळे काही दिवसांसाठी का होईना मोकळेपणा आणि आराम मिळणे शक्य होतं.
मुसलमानांचा या पंथातील सहभागही लक्षणीय आहे. मुसलमान संतांची मोठी परंपरा वारकरी पंथात आहे. शेख महंमदांसारखे जवळपास 25 मुसलमान संत आहेत ज्यांनी मुसलमानी परंपरेत राहून विठ्ठलावरही लिहिलं. अशा पद्धतीने सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्यांशी जुळवून घेणारा आणि टोकाला न जाणारा मार्ग या पंथात दिसतो. मीरा-कबीर यांच्यापासून ते अगदी चैतन्यप्रभूपर्यंत या पंथाने त्यांना सोबत जोडून घेतलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, अपुरी साधनं, नैसर्गिक संकटं अशा परिस्थितीतही ही चळवळ टिकून आहे. आज अत्यंत टोकाला जाणारी धार्मिक उन्मादी प्रवृत्ती, विशेषत: आपल्या देशाला न शोभणारी विचारसरणी वाढवणं चाललेलं आहे.
आपली खरी परंपरा विसरून अतिशय शिताफीनं लोक आक्रमक होत आहेत. याच्याशी मुकाबला करण्याचं उत्तर आपल्याला वारकरी संप्रदायात सापडू शकेल. धर्मवेड्या लोकांची जी वृत्ती आहे ती काही आपल्या मातीतली नाही. वारकरी संप्रदाय जे तत्त्व मांडत आलाय ते आपल्या मातीतलं आहे. सर्वांना जवळ घेणं आणि पराकोटीला न नेणं हे आपल्या मातीतलं तत्वज्ञान आहे. हेच आपल्याला मार्गदर्शक ठरू शकेल.
भालचंद्र नेमाडे
