Monday, September 27, 2021

साहित्याचे प्रयोजन : बी ए भाग ३

साहित्याचे प्रयोजन

साहित्याचे प्रयोजन काय, ह्या प्रश्नाची चर्चा प्राचीन काळापासून आजतागायत अनेक लेखक, समीक्षक, वाङ्‌मयमीमांसक यांनी केली आहे. ह्या प्रयोजनांची चर्चा लेखकसापेक्ष व वाचकसापेक्ष म्हणजेच साहित्याचा निर्मितिव्यापार व आस्वादव्यापार अशा दोन्ही अंगांनी वारंवार होत राहिली आहे. प्रसिद्घी, यश, कीर्ती, मानसन्मान, धनप्राप्ती, मतप्रचार, सामाजिक सुधारणा, दुष्ट रुढींचा नाश, हितोपदेश, राष्ट्रभक्ती व देवभक्ती अशी नानाविध प्रयोजने लेखकांनी मनाशी बाळगून प्राचीन काळापासून आजतागायत साहित्यनिर्मिती केली आहे. काही प्रयोजने विशिष्ट काळ, परिस्थिती यांना अनुलक्षून प्रभावी ठरतात. उदा., पारतंत्र्य काळात स्वातंत्र्यप्राप्ती हाच एकमेव वा प्रधानहेतू मनाशी बाळगून अनेक साहित्यिकांनी लेखन केले. मराठीमध्ये शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी प्रभृती लेखकांनी आपली लेखणी देशकार्यासाठीच राबवली; पण साहित्यनिर्मितीचा स्थल-काल-परिस्थितिनिरपेक्ष विचार केला, तर उच्च कोटीच्या अलौकिक आनंदाची प्राप्ती हेच साहित्याचे सार्वकालीन, सर्वदूर, सर्वत्र आढळणारे प्रयोजन असल्याचे दिसून येते. असा सर्जनशील आनंद लेखकाला निर्मितीसाठी, तर वाचकाला आस्वादासाठी प्रवृत्त करतो. सर्जनशीलतेच्या पातळीवर उच्च दर्जाची कलात्मक निर्मिती साधणे, हे लेखकाच्या आनंदाचे निधान होय. आत्माविष्कार व आत्मशोध ह्या प्रेरणाही लेखकाला लिखाणासाठी उद्युक्त करतात.

साहित्याचे प्रयोजन हे जसे लेखकाच्या दृष्टीने तसेच वाचकाच्या दृष्टीनेही प्रतिपादिले जाते. वाचक साहित्याचे वाचन कशासाठी करतो, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधतानाही समीक्षकांनी विविध उपपत्ती, प्रणाली मांडल्या आहेत. चार घटका मनोरंजन, विरंगुळा, दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून सुटका, स्वप्नरंजन, उद्‌बोधन, जिज्ञासातृप्ती, ज्ञान व माहिती मिळविणे, दैनंदिन समस्यांवर तोडगा शोधणे, अशा अनेकविध कारणांनी वाचक साहित्याकडे वळत असतात व काही प्रमाणात त्यांना साहित्याकडून वरील प्रकारचे समाधान लाभतही असते; तथापि वाचकाच्या ठायी साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी सहृदयता असेल व त्याची वाङ्‌मयीन अभिरुची विकसित, संपन्न व प्रगल्भ झालेली असेल, तरच त्याला दर्जेदार व श्रेष्ठ प्रतीच्या साहित्याच्या आस्वादातून उच्च कोटीचा अलौकिक आनंद मिळू शकतो, लौकिक व्यवहारनिरपेक्ष सौंदर्याची प्रचीती येते. त्याच्या जीवनविषयक जाणिवा समृद्घ होऊन आयुष्याचा नवा अर्थ प्रत्ययास येतो. साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडत असते. व्यक्तिगत रीत्या प्रत्येकाचे अनुभव तसे मर्यादितच असतात; पण श्रेष्ठ साहित्यिकाने निर्मिलेल्या उच्च दर्जाच्या साहित्यकृतीतून मानवी मनाचे व जीवनाचे विस्तृत, वैविध्यपूर्ण, सर्वांगीण व परिपूर्ण दर्शन घडते. अशा साहित्याच्या परिशीलनातून वाचकाच्या अनुभूतीच्या कक्षा विस्तारत जातात. त्याला कल्पनेच्या पातळीवर अनेकविध प्रकारचे अनुभव घेता येतात. त्याला पूर्वपरिचित असलेल्या अनुभवांच्या साहित्यातील दर्शनातून पुनःप्रत्ययाचा; तर सर्वस्वी अपरिचित असलेल्या अनोख्या, अद्‌भुत, अज्ञात, नावीन्यपूर्ण अशा अनुभवांच्या साहित्यातील दर्शनातून नवप्रत्ययाचा अलौकिक आनंद मिळतो. मानवी जीवनाची अफाट व्याप्ती व खोली तसेच व्यामिश्र, बहुआयामी, नानाविध परिमाणे त्याला साहित्याच्या परिशीलनातून जाणवतात. जीवनातील गुंतागुंतीच्या गहनगूढ समस्यांवर उद्‌बोधक प्रकाश पडतो. मानवतेचे अधिष्ठान असलेल्या नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांची नव्याने जाणीव होते व त्याची एकूण मानवी जीवनाविषयीची जाण समृद्घ, प्रगल्भ बनते. कोणत्याही सर्जनशील साहित्यातून त्या त्या मानवसमूहाच्या भाषेतील व संस्कृतीतील सूक्ष्मता आणि प्रगल्भता व्यक्त होत असते; मनुष्य आणि भौतिक-आधिभौतिक जग यांच्यातील संबंधांची अभिव्यक्ती होत असते. सर्जनशील साहित्य हा खरेतर एक ज्ञानगर्भ व्यवहार असतो आणि साहित्यसमीक्षा व वेगवेगळे साहित्यसिद्घांत आपापल्या परीने वेगवेगळ्या उपपत्ती व अर्थनिर्णयनप्रणाली मांडून ह्या ज्ञानात्म सर्जनशील व्यवहाराचा उलगडा करण्याचाच प्रयत्न करीत असतात. अशा वेगवेगळ्या भूमिकांतून व दृष्टिकोनांतून जगभरातल्या वाङ्‌मयांचे भाषिक इतिहास लिहिण्याचे प्रयत्नही आजवर वेळोवेळी झालेले आहेत. विशिष्ट भाषेतील समग्र वाङ्‌मयकृतींचा आणि वाङ्‌मयविषयक घडामोडींचा एका विवक्षित दृष्टिकोनातून केलेला पद्घतशीर व परंपराधिष्ठित ऐतिहासिक अभ्यास म्हणजे वाङ्‌मयेतिहास. साहित्याचा हा इतिहास विशिष्ट समाजाच्या वाङ्‌मयीन संचिताचा व त्याचबरोबर सामाजिक-सांस्कृतिक दस्तऐवजाचा ऐतिहासिक आलेख असतो. मानवी संस्कृती समृद्घ करणाऱ्या ललित व वैचारिक साहित्यास लाभलेल्या वैविध्यपूर्ण व व्यापक परिमाणांची कल्पना अशा वाङ्‌मयेतिहासातून व साहित्यसमीक्षेतून येऊ शकते.

Tuesday, September 21, 2021

संत ज्ञानेश्वर : बी ए भाग ३

संत ज्ञानेश्वर : (इ. स. १२७५ ते १२९६)महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञ प्रवर्तक. बाप विठ्ठलसुत, ज्ञानाबाई, ज्ञानदेव या नावांनीही त्यांना ओळखले जाते. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ > मत्स्येंद्रनाथ > गोरक्षनाथ > गहिनीनाथ > निवृत्तिनाथ > ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व बहुतेक अभंग-गाथा ह्यांत ते स्वतःच्या नावाचा निर्देश ज्ञानदेव असाच करतात; परंतु ⇨ नामदेव, ⇨मुक्ताबाई, ⇨ एकनाथ इ. संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वर असाही उल्लेख अनेकदा येतो.

आपेगाव (तालुका पैठण) हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. आडनाव कुळकर्णी. हे माध्यंदिन शाखेचे यजुर्वेदी ब्राह्मण. गोत्र पंचप्रवरान्वितवत्स. आज ज्ञात असलेले त्यांचे पहिले पूर्वज त्यांच्या पणज्यांचे पणजे हरिपंत कुळकर्णी हे इ. स. ११३८ च्या सुमारास आपेगावचे कुळकर्णपण पाहत असत. या घराण्यातील ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यांस त्यांची पत्नी निराई हिच्यापासून पंचावन्नाव्या वर्षी एक पुत्र झाला. त्याचे नावविठ्ठल. हेच विठ्ठलपंत ज्ञानदेवांचे जनक होत. विठ्ठलपंतांनी वेद, काव्य, व्याकरण व विविध शास्त्रे ह्यांचे अध्ययन केले. ऐन तारुण्यातच वैराग्य, भक्ती व ज्ञान उत्पन्न होऊन पुष्करादी तीर्थांची यात्रा करावी, म्हणून मातापित्यांना वंदन करून त्यांनी तीर्थाटन केले आणि इंद्रायणीतीरी असलेल्या आळंदीस आले. तेथे थोर ब्राह्मण सिदोपंत ह्यांची भेट घेऊन त्यांचे चरण त्यांनी वंदिले. सिदोपंतांच्या आश्रमात त्यांनी वास्तव्य केले. नंतर त्यांच्याच रखुमाई या कन्येशी विठ्ठलपंतांचे शास्त्रोक्त रीतीनेलग्न झाले.

विठ्ठल-रखुमाई हे दोघे पतिपत्नी पंढरपूरला सिदोपंतांबरोबर यात्रेसगेले. पुढे आपेगावी येऊन गृहस्थाश्रम स्थिरपणे करावा की तीर्थाटन करीत देह झिजवावा, असा प्रश्न विठ्ठलपंतांच्या मनात घोळत होता. विठ्ठलपंत आपेगावी न परतताच सिदोपंतांचा निरोप घेऊन नामसंकीर्तन करीत तीर्थाटनास गेले आणि बरीच तीर्थे पाहून परत आळंदीस येऊन ते सिदोपंतांस भेटले. सिदोपंतांची आज्ञा घेऊन अखेरीस त्यांच्याबरोबरच आपेगावी येऊन त्यांनी मातापित्यांचे दर्शन घेतले. मातापिता दोघेही फार वृद्ध होती. स्वानंदपूर्ण स्थितीत ती दोघे वैकुंठवासी झाली; परंतु विठ्ठलपंत विरक्तहोते.

सिदोपंत आपेगावी आले आणि विठ्ठल-रखुमाई या दोघांना बरोबर घेऊन आळंदीस आले. अनेक वर्षे झाली तरी विठ्ठलपंतांस अपत्य झाले नाही. त्यांनी पत्नीस सांगितले की, वाराणसीस जाऊन संन्यास घ्यावासा वाटतो. तेव्हा रखुमाईने संततीवाचून संन्यास घेऊ नये, ही गोष्ट पतीसपटवा,असे आपल्या पित्यास सांगितले; मात्र विठ्ठलपंतांचे मन वळले नाही. पत्नी निद्रेत असता त्यांनी गृहत्याग केला, असे ज्ञानेश्वरादींना पैठणस्थब्राह्मणांनी दिलेल्या बोपदेवलिखित शुद्धिपत्रात म्हटले आहे.

विठ्ठलपंत वाराणसीस गेले. तेथील एका प्रसिद्ध संन्यासी महंतांपासून त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. ह्या संन्यासी महंतांचे नाव नामदेवांनी सांगितलेलेनाही. श्रीपाद म्हणून त्यांचा निर्देश केला आहे. संन्यासी व्यक्तीचा श्रीपादह्या आदरार्थी अभिधानाने निर्देश करावा, असे यतिधर्मसंग्रह ह्या संन्यासाश्रमाच्या धर्मशास्त्राच्या संस्कृत ग्रंथात म्हटले आहे.

ज्ञानेश्वरांनी संन्यासविषयक अभंगगाथेतही संन्यासी व्यक्तीचा श्रीपाद ह्या आदरार्थी सामान्य संज्ञेने निर्देश केला आहे. काही चरित्रकार (उद्धवचिद्धनकृत श्रीज्ञानेश्वरचरित्र) ह्या विठ्ठलपंतांच्या संन्यासी गुरूचा नृसिंहाश्रम असा, तर काही (बोपदेवलिखित शुद्धिपत्र) रामानंद असा, निर्देश करतात.अर्थात हे रामानंद कबीरकालीन प्रसिद्ध रामानंद नव्हते. विठ्ठलपंतांच्या संन्यासग्रहणानंतर त्यांना चैतन्याश्रम हे अभिधान गुरूंनी दिले.

इकडे आळंदीस रखुमाईने जीवित सार्थक व्हावे म्हणून अश्वत्थाची सेवा आरंभिली. तेथे कालांतराने वाराणसी येथील एक संन्यासी आले. योगायोगाने तेच विठ्ठलपंतांचे गुरू होते. रखुमाईने नमस्कार केला. महंतांनी ‘पुत्रवती हो’ असा आशीर्वाद दिला. तिला हसू आले, विनोद वाटला. महंतांनी विचारले, ‘मिस्किलपणे का हसतेस ?’ ती म्हणाली, ‘पतीने संन्यास घेतला आहे; मग आपले बोल खरे कसे होणार?’ महंतांनी सगळी हकीकत विचारून घेतली. रखुमाईने मातापित्यांची महंतांशी भेट करविली. महंतांची अर्घ्यपाद्यपूजा व भोजन झाले.

महंत रामेश्वरच्या यात्रेला निघाले होते. सिदोपंतांनी प्रार्थना केली की, दयावंत होऊन वाराणसीस लगेच परतून जावयांचे मन वळवा. महंतांना वाटले : आपण विठ्ठलपंतांस अवेळी म्हणजे पत्नी तरुण व संतती नाही अशा स्थितीत संन्यास दिला, ह्याचा दोष आपणासही लागतो, आपले पुण्य लयाला जाते. विठ्ठलपंतांनी, आपल्यामागे तसा पाश नाही इ. खोटेच सांगून गुरूंपासून संन्यास घेतला, असे काही चरित्रकारांनी ह्या संदर्भात सांगितले आहे; परंतु नामदेव तसा उल्लेख श्रीज्ञानेश्वरांची आदिमध्ये करीत नाहीत. हा अनुल्लेख गुरूंच्या ह्या उक्तीशी सुसंगत ठरतो. खोटे सांगून संन्यास घेतला असता तर गुरूंकडे दोष गेला नसता म्हणून महंतांनी लगेच वाराणसीस प्रयाण केले व चैतन्याश्रमाला बोलावून घेतले. चैतन्याश्रमाने मान्य केले की, ‘कांतेचा त्याग करून मी आलो आहे.’ महंतांनी आज्ञा केली की, ‘पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकार.’

तेव्हा चैतन्याश्रम स्वदेशी परतले. संन्यासाश्रम टाकून त्यांनी पुनश्च गृहस्थाश्रम पत्करला. त्यामुळे ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. अशीबारा वर्षे निघून गेली. चार अपत्ये झाली; ती म्हणजे ⇨ निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर,⇨ सोपानदेव व ⇨ मुक्ताबाई. मुलगे व्रतबंधाला योग्य झाले. द्विजवृंदाच्या अनुज्ञेनुसार विठ्ठलपंत भार्या, पुत्र व गृह यांचा त्याग करूनव द्विजवृंदाला नमस्कार करून देहान्त प्रायश्चित्त घेण्यासाठी निघून गेले.

बहिष्कारामुळे आपली वंशावळी जातिकुळावेगळी झाली असल्या-मुळे प्रायश्चित्त घेणे अवश्य आहे, असा विचार विठ्ठलपंतांनी केला. त्यांनी ब्रह्मसभा भरविली व त्या सभेत ‘ह्या दीनाला अपराधाची क्षमा करा ‘अशी प्रार्थना केली. तेव्हा निवृत्ती ब्रह्मसभेला उद्देशून म्हणाले, ‘आम्हांला मार्ग सांगा ‘. द्विजांनी सांगितले की, ‘पैठणला जा, तिकडून शुद्धिपत्रआणा,ते मान्य होईल. निवृत्ती म्हणाले, ‘आमची परंपरा सगुण व निर्गुण ह्यांच्या पलीकडील आहे. जाती, कुळ, वर्ण किंवा विश्वातील पंच-महाभूते, विराट, महत् ह्यांपैकी आम्ही काही नाही, निजबोधस्वरूप आहोत.’ ह्यावर ज्ञानेश्वर म्हणाले, ‘आपली पावन अवस्था असली, तरी धर्मशास्त्राच्या पद्धतीने आपण चालले पाहिजे.’ ह्यावर सोपान म्हणाले, ‘पांडव, व्यास वाल्मीकी, वसिष्ठ ह्यांचे तरी कुळ किंवा जाती शुद्धकुठे आहे ⇨ तसेच आमची भक्ती हाच आत्मस्थितीचा उपाय होय, जाती किंवा कुळ नव्हे.’

ज्ञानदेवरचित ज्ञानेश्वरीची सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी फारसंपन्न होती. ज्ञानदेवांच्या कालखंडात महाराष्ट्रातील भौतिक व आध्या-त्मिक संस्कृतीचा उत्कर्ष होत होता. ज्ञानेश्वरी हे त्या उत्कर्षाचेचउत्कृष्ट फलित होय. सातशे वर्षे झाली; तरी धर्म, तत्त्वज्ञान व काव्यह्यांची अनुपम परिणती म्हणजे ज्ञानेश्वरी असे अजून म्हणता येते. तत्पूर्वीसु. शंभर-दीडशे वर्षे मराठी भाषेतील साहित्य विकास पावत होते. हाकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात फार महत्त्वाचा आहे. स्वतः ज्ञानदेवांनीच श्रीरामचंद्र ह्या यादव राजाचे यदुवंश-विलास,सकळकळानिवास व न्यायाचा पोषक क्षितीश म्हणून वर्णन केले आहे. दोनशे-अडीचशे वर्षांच्या ह्या कालखंडात देवगिरीच्या यादवांचे राज्य विस्तारत व विकास पावत होते.

भास्कराचार्य, हेमाद्री, बोपदेव ह्यांच्यासारखे विद्वान ह्या कालखंडात झाले. ⇨ भास्कराचार्य हे भारताच्या गणित व ज्योतिष विद्येचे शिरोमणीच होते. भास्कराचार्यांच्या वंशातील सात पिढ्या लगोलग चतुरस्र विद्वानांच्या झाल्या. ज्योतिष, वैद्यक, धर्मशास्त्र, न्याय, मीमांसा, वेदान्त व व्याकरण ह्यांचे अध्ययन विदर्भासह महाराष्ट्रातील निरनिराळ्या पाठशाळांमध्ये चालू होते. बोपदेवांनी व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, साहित्यशास्त्रावर तीन, भागवतावर चार व ज्योतिषावर एक असे २७ प्रबंध लिहिले होते.

बोपदेवांचे भागवतावरील हरिलीला, मुक्ताफळ, परमहंसप्रिया व मुकुट हेचार ग्रंथ विद्वन्मान्य झाले होते. ह्याचा अर्थ असा की, महाराष्ट्रातश्रीमद्भागवताचा महिमा फार होता;नाथसंप्रदायाचाही प्रभाव होता, हे ज्ञानदेवांच्या तीन पिढ्यांवर नाथसिद्धांचा अनुग्रह होता ह्यावरून लक्षात येते. शांकर अद्वैताला महाराष्ट्रात फारच मोठी प्रतिष्ठा लाभली होती, हे ज्ञानेश्वरीवरून लक्षात येते. अजंठा, वेरूळ इत्यादी लेण्यांवरून महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या अगोदर सुमारे हजार-बाराशे वर्षे मूर्ती, चित्र व स्थापत्य ह्या कला अनेक अंगांनी विकसित होत होत्या, ह्याचे प्रत्यंतर मिळते. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही हेमाडपंती शैलीची आहेत, असे म्हणतात; म्हणजे असे की, स्थापत्यकलाही फार लोकप्रिय झाली होती. ज्ञानेश्वरी हे त्या भव्य संस्कृतीचे सुंदर व पवित्र प्रतीक व प्रतिबिंबच आहे, असे म्हणावेलागते; इतक्या श्रेष्ठ साहित्यकृतीला श्रेष्ठ सांस्कृतिक पार्श्वभूमीच प्राप्तव्हावी लागते. त्याशिवाय ती निराधार ठरते, तिची सामाजिक उपपत्तीलागू शकत नाही.

बहिणाबाईने एका अभंगात भागवत धर्माचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचला, असे म्हटले आहे; कारण तोपर्यंत धर्माची मुख्य भाषा किंवा माध्यम संस्कृत भाषाच होती. भगवद्गीतेचा व भागवताचा प्रचार सर्वत्र होता; परंतु हे ग्रंथ संस्कृतमध्ये अडकले होते. लोकभाषेला परमार्थ विचाराचे समर्थ माध्यम प्रथम ज्ञानदेवांनी केले. संस्कृत ही देववाणी होती व धर्मामृत ह्या देववाणीत बंद होते. ह्या अमृताला पैजेने जिंकणारीदेशी भाषा ज्ञानदेवांनी निर्मिली; धर्म, तत्त्वज्ञान व साहित्यकला ह्यांचे सामान्यजनांपर्यंत पोहचवणारे माध्यम निर्माण केले. शांतरस प्रतिपादिला.तो रस श्रेष्ठ ठरविल्यामुळे विवेकबुद्धीला उजाळा मिळाला आणि भक्तिमार्गाला ज्ञानेश्वरांनी शुद्ध केले.

शिवाय भगवान बुद्धांपासून शंकराचार्यांपर्यंत संन्यासाश्रमच श्रेष्ठ असे परमार्थाचे साधन मानले गेलेव ज्ञानदेवांपर्यंत संन्यासच श्रेष्ठ मानला जात होता; परंतु अनासक्तीचा गृहस्थाश्रमच परमार्थाचा श्रेष्ठ मार्ग म्हणून प्रथम ज्ञानदेवांनी दाखवून दिला. संन्यासमार्गाऐवजी गृहस्थाचा भक्तिमार्ग उजळविला. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूपच होय, त्याचाच उल्हास होय, असे सांगून,सगुण व निर्गुण ह्या दोन्ही एकाच परमसत्याच्या बाजू होत, असे वारंवार प्रतिपादले.ज्ञानदेवांची निश्चित ग्रंथरचना म्हणजे भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अनुभवामृत, चांगदेवपासष्टी व अभंगगाथा ही होय. अभंगगाथेत काहीथोडे अभंग प्रक्षिप्त असावेत, अशी शंका राहते.

लोककथा : जंगलचा राजा (बी ए भाग ३)

जंगलचा राजा !

एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.

सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे. माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण...

मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!

बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.

'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण...

तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात. अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू.

जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता...

'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण....

सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!

Monday, September 20, 2021

इतर वाचन : बी ए भाग ३

जादा वाचनासाठी... 
जीवनासाठी शिक्षण कसे निर्माण करावे  ? 
अभय बंग यांचा साधनातील लेख वाचा... 
Click here 👇

Wednesday, September 1, 2021

लोककथा : गजेंद्रमोक्ष (बी ए भाग ३)

अंबरीश आणि अजामिळ ही दोन वयानं मोठी माणसं आणि उपमन्यू व ध्रुव ही लहान मुलं; यांचा देवानं कसा सांभाळ केला हे समर्थानी सांगितलंआहेच. आता कथा आहे ती हत्तींचा राजा गजेंद्राची! या पाच उदाहरणांमध्ये हा एकच पशू आहे. गजराज गजेंद्र हा आधीच्या जन्मात पांडय़ देशाचा राजा इंद्रद्युम्न म्हणून विख्यात होता. तो मोठा विरक्त विष्णुभक्त होता. परमात्मप्राप्ती हेच त्याच्या जीवनाचं मूळ ध्येय होतं आणि ते साध्य करण्यासाठी तो मलय पर्वतावर सदोदित तपाचरणात निमग्न असे. असाच एकदा तो साधनामग्न असतानाच अगस्त्य मुनी तिथे आले. मूळ कथा सांगते की, आपला योग्य आदरसत्कार न करता राजा साधनारत असल्याचं पाहून मुनी संतप्त झाले आणि त्यांनी राजाला शाप दिला की, ‘‘तू गजबुद्धीनुसार मंद वर्तन केलं आहेस, तर तू पुढच्या जन्मी हत्ती म्हणूनच जन्म घेशील!’’  ‘गजेंद्रमोक्ष स्तोत्रा’त एक विराट रूपक उलगडते, आणि त्या शापाच्या जागी वरच दिसू लागतो. असं वाटलं की, राजा ज्या परम विशेष ध्येयानं जगत आहे ते परमात्म प्राप्तीचं ध्येय त्याला लवकरात लवकर कसं साधेल, ही चिंता मुनिवरांनाही लागली. यापुढील राजाचे जन्मही त्यांनी जाणले आणि मग असा जन्म मिळावा ज्यात हे ध्येय तात्काळ साध्य व्हावं, या विचारानेच हत्तीचा जन्म लाभला. त्या जन्मातही राजा हा हत्तींचा राजा गजेंद्र म्हणूनच जन्मला. एकदा तो अनेक हत्तिणींसह वनात फिरत असताना तहानेनं व्याकूळ होऊन कमलपुष्पांनी युक्त अशा सरोवराकडे निघाला. त्या सरोवरात जलपान केल्यानंतर त्यानं जलक्रीडा सुरू केली. जलक्रीडेत हत्तिणींसह दंग असलेल्या गजेंद्राचा एक पाय एका नक्रानं (मगरीनं) पकडला. हा नक्रदेखील गेल्या जन्मीचा हुहू हा गंधर्व होता आणि देवल ऋषींच्या शापामुळे या मगरयोनीत जन्मला होता. गजेंद्रासमोर आकार आणि शक्तीच्या दृष्टीने हा नक्र अत्यंत तुच्छ भासत होता. त्यामुळे गजेंद्राने जोराचा हिसडा देऊन त्याला दूर फेकण्याचा प्रयत्न केला, पण नक्राची पकड अधिकच घट्ट झाली. गजेंद्राने आटोकाट प्रयत्न करूनही काही उपयोग होईना आणि मग हत्तिणींनीही बळ लावून काही होईना तेव्हा गजेंद्राचे अनेक आप्त-मित्र गोळा झाले. तेही ताकदीने मोठे होतेच. त्या सर्वानी सर्व ताकद पणाला लावून गजेंद्राला सरोवराबाहेर खेचण्याचा प्रयत्न चालविला. पण जसे ते हत्ती गजेंद्राला बाहेर खेचत त्याच वेगाने तो नक्र गजेंद्राला सरोवरात ओढत असे. हा खेचाखेचीचा क्रम हजारो र्वष सुरू होता, असं पुराण सांगतं! थकून सर्व आप्तमित्रांनी प्रयत्न सोडून दिल्यावर अखेर आपण बुडून मरणार ही जाणीव गजेंद्राला झाली. जसजसा तो पाण्यात बुडू लागला तसतसं त्याला जन्म व्यर्थ गेल्याचं जाणवलं. एक कमलपुष्प सोंडेत घेऊन त्याने आकाशाकडे उंचावत भगवंताची विनवणी सुरू केली. ही शरणागत प्रार्थना म्हणजे गेल्या जन्मीच्या भावसंस्कारांतून प्रकट झालेलं स्तोत्रच आहे. ‘गजेंद्रमोक्ष स्तोत्र’ म्हणून ते विख्यात आहे. तर विनवणीमागचा भाव हा होता की, ‘‘हे भगवन, मी जन्मभर तर तुझी भक्ती केली नाही, पण अखेरच्या क्षणी का होईना, मी एक कमलपुष्प तुला अर्पण करू इच्छितो त्याचा स्वीकार कर!’ गजेंद्राने कमलपुष्प सोंडेत धरलं होतं आणि वेगाने तो पाण्यात बुडू लागला होता. आता सोंडेचा अगदी थोडा भाग पाण्यावर असतानाच गरुडावर बसलेल्या भगवान विष्णूंनी धाव घेतली. त्यांनी प्रथम सुदर्शनचक्र सोडून त्या नक्राचा शिरच्छेद केला आणि गजेंद्राची त्या सरोवरातून सुटका केली. शापमुक्त झाल्याने तो नक्र गंधर्व रूपात प्रकटला आणि गजेंद्रही विष्णुभक्ताच्या रूपात प्रकटला.