Monday, February 26, 2024

म म मराठी....

किल्ला, जहाज आणि दरवाजा... खुर्ची, कागद आणि दुकान... नजर, साल आणि फक्त... हे शब्द कुठल्या भाषेतले आहेत? आज मराठीत सर्सास वापरले जात असले, तरी हे सगळे शब्द मूळचे मराठी नाहीत, असं सांगितलं तर?

हे सगळे शब्द फारसी भाषेतून आले आहेत आणि मराठीनं ते आपलेसे केले आहेत. आजच्या काळात इराणची अधिकृत भाषा असलेली फारसी ही महाराष्ट्रात अनेक शतकं व्यवहाराची भाषा बनली होती.

आजही आपल्या रोजच्या वापरातल्या मराठीमध्ये या भाषेच्या पाऊलखुणा दिसतात. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही त्याच पाऊलखुणांचा मागोवा घेतो आहोत.

फारसी-मराठीचं नातं कसं जुळलं? मराठी आणि फारसीचा संबंध अगदी जुना आहे. या दोन्ही एकमेकींच्या दूरच्या मावसबहिणी आहेत असं म्हणायलाही हरकत नाही.

फारसी आणि मराठी या एकाच मोठ्या कुळातल्या भाषा आहेत. इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली म्हणजे युरो-भारतीय भाषा कूळ असं त्याचं नाव. या दोन्ही भाषांचं उपकूळही एकच आहे जे इंडो-इराणी म्हणून ओळखलं जातं.

त्यामुळे आपोआपच वाक्यरचनेच्या पातळीवर किंवा काही मूलभूत शब्दसंग्रह आणि संरचनांच्या बाबतीत फारसी आणि मराठीमध्ये साम्य आढळून येतं. दुसरं म्हणजे फारसी भाषेत साठ टक्के शब्द अरबी भाषेतले आहेत. म्हणजे फारसीवाटे ते मराठीत आले आहेत.

मुस्लिम राजवटीमुळे फारसी महाराष्ट्रात आली, असं ढोबळमानाने अनेकांना वाटतं. पण ते पूर्णपणे खरं नाही. फारसीचे मराठीशी भाषिक संबंध पूर्वापार चालत आले आहेत आणि मुसलमानी राजवटीत ते अधिक घनिष्ठ झाले आहेत. बाराव्या शतकानंतरच्या कालखंडातील मराठी भाषेत फारसीचं प्रतिबिंब आढळून येऊ लागलं.

फारसी भाषा मुस्लीम राज्यकर्त्यांसोबतच व्यापारी, प्रवासी आणि सुफी संतांच्या मार्फतही महाराष्ट्रात आली; पण ती इथे रुळली आणि मराठीत मिसळली, ती मात्र राजभाषा म्हणूनच. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण या प्रदेशाचं राजकारण बदलवून टाकणारं ठरलं. मग चौदाव्या शतकात मोहम्मद तुघलक शहानं आपली राजधानी काही वर्षांसाठी दिल्लीहून देवगिरीला म्हणजे आजच्या दौलताबादला हलवली. त्यानंतर बहामनी राजवटींच्या काळात फारसी महाराष्ट्राची राजभाषा म्हणून आणखी रूढ होत गेली.

दहाव्या शतकानंतर एकूणच भारतात सगळीकडेच वेगवेगळ्या इस्लामिक राज्यकर्त्यांचा प्रभाव राहिला. आपल्याकडे महसूल व्यवस्था अस्तित्वात आली, त्यात मुस्लिम राज्यकर्त्यांचं योगदान मोठं आहे. या महसुली व्यवस्थेतले अनेक फारसी शब्द आजही रूढ आहेत.

पंधराव्या शतकात विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही या सगळ्यांचा उदय सुरू झाला. त्यांची राज्यकारभाराची भाषा म्हणजे फारसी ही व्यवहाराची भाषा बनत गेली. जमादार, फौजदार, भालदार, चोपदार, नाका, जकात हे सगळे शब्द या इस्लामी भाषांमधून आपल्याकडे आले आहेत.

संत एकनाथांचा एक 'अर्जदस्त' प्रसिद्ध आहे. या अर्जातले बहुतांश शब्द, अगदी अर्ज हा शब्दसुद्धा, फारसी भाषेतील आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही फारसीचा वापर खूप वाढला होता. त्या काळातल्या अनेक पत्रांमध्ये फारसीचं वर्चस्व दिसतं. इतकं, की अनेकदा आपण नेमकी कोणती भाषा वाचतो आहोत, असा प्रश्न पडावा.

स्वतः शिवाजी महाराजही उत्तम फारसी बोलू शकत होते, असे उल्लेख आहेत, पण त्यांनीच मराठीवरचा फारसीचा हा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्नही केले. स्वराज्याची स्थापना केल्यानंतर महाराजांनी राजव्यवहार कोषाची निर्मिती केली. व्यवहारातील प्रधान, अमात्य, सरसेनापती असे शब्द छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्यानं रूढ केले. पण गड, किल्ले यांच्यासंदर्भात असेल किंवा इतर अनेक गोष्टींसाठी फारसी शब्दच वापरात कायम राहिले. आजही महाराष्ट्रात, विशेषतः निजामाच्या प्रभावाखाली राहिलेल्या मराठवाड्यात बोलीभाषेवर फारसी शब्दांचा आणि फारसीतूनच जन्मलेल्या उर्दूचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. फारसी आणि मराठीचं हे नातं अनेकांना भुरळ पाडत आलं आहे. या नात्याचा आणि फारसीच्या मराठीवरील प्रभावाचा अभ्यास गेली जवळपास शंभर वर्ष सुरू आहे. फक्त शब्दच नाही, तर शह देणे, आर्जव करणे, वाहवा करणे, सर्द होणे, दावा सांगणे, दौलतजादा करणे, नेस्तनाबूत करणे असे वाक्प्रचार आणि शब्दरचनांही फारसीनं मराठीला दिलेली देणगी आहे.

भाषाशुद्धीसाठी अनेक चळवळी होऊनही हे शब्द टिकून राहिले आहेत, कारण ते मराठीनं स्वीकारले आहेत, आपलेसे केले आहेत. केवळ संस्कृत आणि प्राकृतपासून मराठीचा विकास झाला, असा अनेकांचा समज असतो पण मराठीनं या भाषांबरोबरच फारसी, इंग्रजी, भाषांमधूनही बरंच काही स्वीकारलं आहे. तुर्की, अरबी, कानडी, तेलुगू, गुजराती, हिंदी, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि पंजाबीतले शब्दही मराठीत रुळले आहेत.
                                                                     🪴

Thursday, February 15, 2024

चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून...!

माणसाला आयुष्यातला प्रत्येक क्षण समृद्ध करत असतो, फुलवत असतो. आपण सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यासारख्या गोष्टीच्या मागं धावताना असं समृद्ध होणं,फुलणं विसरून जात असतो.जीवनाचे महत्त्व समजून आपण प्रत्येक क्षण मनापासून जगावा, यासाठी डॉ.आ.ह.साळुंखे यांनी जीवनाचं हे साधं,सरळ तत्वज्ञान आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगातून,अनुभवातून 'चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून!' या पुस्तकातून मांडलेलं आहे.

आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते. या पुस्तकामध्ये लेखकाने आपल्या जीवनातील जगणं समृद्ध करणारे अनुभव,प्रसंग मांडलेले आहेत. 

लेखक सांगतात की पहिल्यांदा कन्याकुमारीला गेलो.भारतभूमीच्या दक्षिण सीमेवरील अखेरच्या भिंतीवर उभा होतो तेव्हा तीन समुद्राच्या लाटा मला भिजवून चिंब चिंब करीत होत्या. हा प्रत्यक्ष अनुभव घेताना मी खरोखरच शहारून गेलो होतो. तो माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण होता. पण मी एकोणसाठाव्या वर्षाऐवजी एकोणिसाव्या वर्षी कन्याकुमारीला जायला हवं होतं,असं लेखकाला वाटतं.

लेखक सांगतात की आपल्या मालकीच्या वस्तूंची संख्या वाढून आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होत नाही वस्तू मिळवण्याच्या नादात आपण जीवन जगण्याचं विसरून जाण्याचा धोका असतो. आपण आपलं अनुभवविश्व किती संपन्न केलं.आपल्याला सच्ची मैत्री किती मिळाली.आपण इतरांना किती जीव दिला. इतरांची किती कदर केली. इतरांना वाढवण्यासाठी किती आधार दिला. किती जणांच्या अश्रू पुसले. आपण अश्रू ढाळत असताना ते पुसण्यासाठी आसपास किती लोक होते. यांसारख्या गोष्टीचा हिशोब करून आपल्या जीवनाची समृद्धी मोजावी. वस्तूवर मालकी मिळवणं पुरेसं नाही,अत्यावश्यक नाही - त्या वस्तूसह वा प्रसंगी त्या वस्तूंच्या अभावीही जीवन उत्कटपणानं जगता येणं महत्त्वाचा आहे. जीवनाचा खराखुरा आनंद घेणं, जीवन अनुभवणं हा 'एरिक फ्राॅम' या मानसशास्त्राज्ञाचा संदेश लेखक सांगतात.

लेखकांनी वरिष्ठ महाविद्यालयात बरीच वर्षे संस्कृत विषयाचे अध्यापन केले. लेखक प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते, प्रसिद्ध साहित्य आहेत. सॉक्रेटिस, चार्वाक, पाणिनी यांच्या समृद्ध जीवन जगण्याची उदाहरणे लेखक सांगतात. विवेकवादी विचारांवर ठाम राहून आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहणारा सॉक्रेटिस, मानवजातीला ज्ञानाचा नवा प्रकाश मिळावा, तिचं माणूसपण उन्नत व्हावं, यासाठी ज्ञानाचा एक एक कण मिळविण्यासाठी कसं झोकून द्यावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध व्याकरणकार 'पाणिनी'. पाणिनी व सॉक्रेटिस यांच्या जगण्याची उदाहरणे माणसाला समृद्ध बनवतात.

जीवन जगताना, अगदी सर्वसामान्य माणसं ही अनेकदा आपल्याला केवढा उज्वल प्रकाश आणि किती निर्मळ दृष्टी देऊन जातात. याबाबतचे प्रसंग लेखक सांगतात. माणसाच्या आयुष्यात चढ-उताराचे यश अपयशाचे अनेक प्रसंग येतात. चढापेक्षा उताराचा प्रवास क्लेशकारक वाटायला लागतो. अपयश पचवताना वेदना होतात;परंतु अशावेळी मनाचं संतुलन राखायला हवं.आपली जागा घेणा-या व्यक्तीमध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहू शकतो. ती व्यक्ती आपलाच प्रवाह अखंडित ठेवण्याचे काम करीत आहे.असं मानून तिचं आपण अभिनंदन करू शकतो. ज्याला जीवनाच्या उताराचा हा प्रवास आनंदानं, समाधानानं आणि उमेदीने करता येतो. त्यालाच जीवन खर्‍या अर्थाने कळलं असं म्हणता येतं! याबद्दलचा केरळमधील एक अनुभव खूप छान पद्धतीने लेखकांनी मांडलेला आहे.

लेखक सांगतात की जीवन हे या विश्वातले किती सुंदर घटना आहे. हा या विश्वाच्या समग्र अस्तित्वाचा किती पवित्र आणि मंगल घटक आहे. या जीवनाला आधार देणार आपल्या शरीराचं हे इवलसं घरटं हे आनंदाचं केवढं प्रसन्न अधिष्ठान आहे! त्या घरट्याचा भाग असलेले निर्मळ मन आणि विवेकी बुद्धी हे सजीवाचं आणि खास करून माणसाचं केवढं मोठं वैभव आहे!

लेखकांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटना सांगितलेल्या आहेत. छोट्या छोट्या घटना, प्रसंग माणसाच्या जगण्याला कसे समृद्ध बनवतात. याचे मनाला भावणारे वर्णन लेखकांनी केले आहे. जगण्याचं साध तत्वज्ञान सागणारं हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.
                                                                   (संकलन) 

                                        🪴