Dr. Anil Gavali is well known researcher of Linguistics, Criticism, Sant Poem and Modern Literature in Marathi Language. Serve as Dean of Arts and Fine Arts Faculty and Chairperson Board of Studies in Marathi at Shivaji University, Kolhapur (Maharashtra : India) Worked as a member of Senate and Academic Council at Shivaji University.
Wednesday, September 1, 2021
लोककथा : गजेंद्रमोक्ष (बी ए भाग ३)
अंबरीश आणि अजामिळ ही दोन वयानं मोठी माणसं आणि उपमन्यू व ध्रुव ही लहान मुलं; यांचा देवानं कसा सांभाळ केला हे समर्थानी सांगितलंआहेच. आता कथा आहे ती हत्तींचा राजा गजेंद्राची! या पाच उदाहरणांमध्ये हा एकच पशू आहे. गजराज गजेंद्र हा आधीच्या जन्मात पांडय़ देशाचा राजा इंद्रद्युम्न म्हणून विख्यात होता. तो मोठा विरक्त विष्णुभक्त होता. परमात्मप्राप्ती हेच त्याच्या जीवनाचं मूळ ध्येय होतं आणि ते साध्य करण्यासाठी तो मलय पर्वतावर सदोदित तपाचरणात निमग्न असे. असाच एकदा तो साधनामग्न असतानाच अगस्त्य मुनी तिथे आले. मूळ कथा सांगते की, आपला योग्य आदरसत्कार न करता राजा साधनारत असल्याचं पाहून मुनी संतप्त झाले आणि त्यांनी राजाला शाप दिला की, ‘‘तू गजबुद्धीनुसार मंद वर्तन केलं आहेस, तर तू पुढच्या जन्मी हत्ती म्हणूनच जन्म घेशील!’’ ‘गजेंद्रमोक्ष स्तोत्रा’त एक विराट रूपक उलगडते, आणि त्या शापाच्या जागी वरच दिसू लागतो. असं वाटलं की, राजा ज्या परम विशेष ध्येयानं जगत आहे ते परमात्म प्राप्तीचं ध्येय त्याला लवकरात लवकर कसं साधेल, ही चिंता मुनिवरांनाही लागली. यापुढील राजाचे जन्मही त्यांनी जाणले आणि मग असा जन्म मिळावा ज्यात हे ध्येय तात्काळ साध्य व्हावं, या विचारानेच हत्तीचा जन्म लाभला. त्या जन्मातही राजा हा हत्तींचा राजा गजेंद्र म्हणूनच जन्मला. एकदा तो अनेक हत्तिणींसह वनात फिरत असताना तहानेनं व्याकूळ होऊन कमलपुष्पांनी युक्त अशा सरोवराकडे निघाला. त्या सरोवरात जलपान केल्यानंतर त्यानं जलक्रीडा सुरू केली. जलक्रीडेत हत्तिणींसह दंग असलेल्या गजेंद्राचा एक पाय एका नक्रानं (मगरीनं) पकडला. हा नक्रदेखील गेल्या जन्मीचा हुहू हा गंधर्व होता आणि देवल ऋषींच्या शापामुळे या मगरयोनीत जन्मला होता. गजेंद्रासमोर आकार आणि शक्तीच्या दृष्टीने हा नक्र अत्यंत तुच्छ भासत होता. त्यामुळे गजेंद्राने जोराचा हिसडा देऊन त्याला दूर फेकण्याचा प्रयत्न केला, पण नक्राची पकड अधिकच घट्ट झाली. गजेंद्राने आटोकाट प्रयत्न करूनही काही उपयोग होईना आणि मग हत्तिणींनीही बळ लावून काही होईना तेव्हा गजेंद्राचे अनेक आप्त-मित्र गोळा झाले. तेही ताकदीने मोठे होतेच. त्या सर्वानी सर्व ताकद पणाला लावून गजेंद्राला सरोवराबाहेर खेचण्याचा प्रयत्न चालविला. पण जसे ते हत्ती गजेंद्राला बाहेर खेचत त्याच वेगाने तो नक्र गजेंद्राला सरोवरात ओढत असे. हा खेचाखेचीचा क्रम हजारो र्वष सुरू होता, असं पुराण सांगतं! थकून सर्व आप्तमित्रांनी प्रयत्न सोडून दिल्यावर अखेर आपण बुडून मरणार ही जाणीव गजेंद्राला झाली. जसजसा तो पाण्यात बुडू लागला तसतसं त्याला जन्म व्यर्थ गेल्याचं जाणवलं. एक कमलपुष्प सोंडेत घेऊन त्याने आकाशाकडे उंचावत भगवंताची विनवणी सुरू केली. ही शरणागत प्रार्थना म्हणजे गेल्या जन्मीच्या भावसंस्कारांतून प्रकट झालेलं स्तोत्रच आहे. ‘गजेंद्रमोक्ष स्तोत्र’ म्हणून ते विख्यात आहे. तर विनवणीमागचा भाव हा होता की, ‘‘हे भगवन, मी जन्मभर तर तुझी भक्ती केली नाही, पण अखेरच्या क्षणी का होईना, मी एक कमलपुष्प तुला अर्पण करू इच्छितो त्याचा स्वीकार कर!’ गजेंद्राने कमलपुष्प सोंडेत धरलं होतं आणि वेगाने तो पाण्यात बुडू लागला होता. आता सोंडेचा अगदी थोडा भाग पाण्यावर असतानाच गरुडावर बसलेल्या भगवान विष्णूंनी धाव घेतली. त्यांनी प्रथम सुदर्शनचक्र सोडून त्या नक्राचा शिरच्छेद केला आणि गजेंद्राची त्या सरोवरातून सुटका केली. शापमुक्त झाल्याने तो नक्र गंधर्व रूपात प्रकटला आणि गजेंद्रही विष्णुभक्ताच्या रूपात प्रकटला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment